जत तालुक्यातील भूमिपुत्र सक्षम असून पक्षांच्या शिस्तीला बाहेरच्यांनी येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला.जत भाजपच्या सभेमध्ये भूमिपुत्राच्या विषयावरून जोरदार राडा झाला. त्यानंतर पत्रकाराची संवाद साधताना रवीपाटील म्हणाले की, भाजपच्या बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात भूमिपुत्राला संधी मिळाली पाहिजे, भूमिपुत्र सक्षम आहेत. उमेदवारी देताना भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मांडली. परंतु काही व्यक्तींना भूमिपुत्राचा मुद्दा रुचला नाही त्यांनी या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तो अत्यंत दुर्दैवी आहे. जतमधील नेते माजी आमदार विलासराव जगताप, ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी, शंकर वगरे सर, अप्पासाहेब नामद,बसवराज पाटील, प्रभाकर भाऊ जाधव यांच्यासह सर्वच प्रमुख मंडळींनी तालुक्यामध्ये पक्षाचे अत्यंत चांगले काम केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य मिळाले आहे. परंतु बाहेरचे काहीजण येऊन या ठिकाणी वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा रवी पाटील यांनी दिला.
बाहेरच्यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये तम्मनगौडा रवीपाटील यांचा इशारा
October 07, 2024