NC Times

NC Times

राज्यपालांच्याहस्ते माडग्याळ येथील पांडुरंग सावंत कुटुंबियांचा सत्कार सन २०२२मध्ये बाजरीचे विक्रमी उत्पादन:सर्वसाधारण गटात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ /वार्ताहर(जालिंदर शिंदे)-सन २०२२ मध्ये बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेत शेती आणि पीक पद्धतीत बदल करत राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे  खरीप बाजरी अभियान राबवले. यामध्ये येथील  शेतकरी  विठ्ठल सावंत यांचे पुत्र पांडुरंग सावंत यांनी एकरी जेमतेम चार क्विंटल उत्पादन येत असलेल्या शेतात ४३ क्विंटलपर्यंत बाजरीचे उत्पादन घेऊन राज्यात विक्रम केला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत सर्वसाधारण गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल  राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते सावंत कुटुंबियांचे सत्कार करण्यात आले. याबद्दल जत तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
बाजरी उत्पादन स्पर्धेत पांडुरंग सावंत यांनी सर्वसाधारण गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. दुष्काळी भागातील शेतकरी  विठ्ठल सावंत आणि त्यांचा मुलगा पांडुरंग सावंत यांनी या स्पर्धेत सहभागी होत उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी केली होती.  त्याबद्दल  सावंत कुटुंबियांचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन  यांच्याहस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, कृषी सचिव जयश्रीताई भोज, कृषी संचालक विनयकुमार आवटे (विस्तार) तसेच मा. कृषी संचालक  विकास पाटील व इतर सर्व मान्यवर व महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे राज्य शासन कृषी विभागाने  नुकतेच ५१००० रक्कमेचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
बाजरीचे घटते उत्पादन लक्षात घेत शेती आणि पीक पद्धतीत बदल करत राज्याच्या कृषी विभागाने जत तालुक्यातील माडग्याळ येथे बाजरी अभियान राबवले होते. माडग्याळ परिसरातील हा भाग कोरडवाहू, मध्यम व हलक्या प्रतीची जमीन असलेला आहे. या भागात खरिपात प्रमुख पीक म्हणून बाजरीची पेरणी केली जाते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत बाजरी उत्पादन वाढीसाठी जतचे तत्कालीन उप विभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली  खरीप बाजरीचा प्रयोग हाती घेण्यात आला. ३० शेतकऱ्यांचा समता शेतकरी गट स्थापन करून ‘एक गाव-एक वाण’ या अंतर्गत खरीप हंगामामध्ये २५ एकर क्षेत्रावर बाजरीची पेरणी करण्यात आली होती. पीक कापणी प्रयोगामध्ये विठ्ठल ईश्वर सावंत यांचे पुत्र पांडुरंग सावंत यांनी एक एकरात ४३ क्विंटल  उत्पादन घेतल्याचे दिसून आले. हे उत्पादन देशपातळीवर उच्चांकी असल्याचे कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. या विक्रमी उत्पादनाबद्दल पांडुरंग सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांचे कौतुक झाले होते.
पांडुरंग विठ्ठल सावंत यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून माडग्याळ पारिसरात लोकसहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे लावणे यासारखे जलसंधारणाची अनेक कामे केली आहे.  जत तालुक्याच्या दुष्काळ मुक्तीसाठी अनेक उपक्रमात भाग घेऊन सावंत यांनी काम केले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही ते समाज कार्यात सहभागी असतात.