नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर/जालिंदर शिंदे :- हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष महत्त्व आहे.त्यातच श्रावण या पवित्र महिन्यानंतर भाद्रपद महिन्यातील चौथ्या दिवसापासून गणेश उत्सवाला प्रारंभ होतो.आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची मात्र आत्तापासूनच कवठेमहांकाळ तालुक्यातील काही प्रमुख गावात लगबग सुरू झालेली दिसून येत आहे.मागील वर्षी अधिकमासामुळे गणेशोत्सवास उशिरा प्रारंभ झाला होता.यावर्षी मात्र मागील वर्षीच्या तुलनेत तेरा दिवस लवकरच गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने गणपती मंडळे,बँडपथक,ढोल ताशे वाल्यांचे बुकिंग त्याचबरोबर आकर्षक सजावटीसाठीही मंडळे सरसावली आहेत.मूर्तिकारही बाप्पांच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवत आहेत.
सध्या बाप्पांची मूर्ती बनविण्याची लगबग अखेरच्या टप्प्यात आली असून,मागील वर्षी अधिकमासामुळे गणपती बाप्पांचे उशिराने आगमन झाले होते. त्यामुळे मूर्ती कारागिरांनाही अधिक वेळ मिळाला होता.मागील वर्षी १९ सप्टेंबरला बाप्पा विराजमान झाले होते.तर २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्यात आला होता.यावर्षी मात्र सात सप्टेंबरला गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे.तर १७ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.
यावर्षी मात्र अकरा दिवस गणरायाचा मुक्काम राहणार असून,मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाप्पांचे १३ दिवस अगोदर आगमन होणार असल्याने आतापासूनच मूर्तिकार,गणपती मंडळे तयारीला लागले आहेत.मूर्तींची बुकिंग होऊन पोहोच घेतली जात आहे.
बाहेरी राज्यातील मूर्तिकारही मूर्ती बनविण्यासाठी महाराष्ट्रात आल्याने स्थानिक कारागिरांना त्याचा फटका बसत आसल्याचे काही ठिकाणी बोलले जात आहे.त्यातील तालुक्यातील प्रमुख गणपती विक्रेते व्यवसायीक हे व्यवसायासाठी पेण,पनवेल,सांगली,कोल्हापूर येथून गणपती आणत आसल्याने स्थानिक मुर्ती कारागीर हे चांगलेच अडचणीत आले आहेत. ते केवळ चिखल मातीच्या,शाडूच्या व छोट्या रंगीत प्लास्टरच्या मुर्त्या बनवताना दिसत आहेत.त्यामुळे त्याच्या व्यवसायाला चांगल्याच मर्यादा आल्या आहेत.
मुर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव वाढल्याने अर्थात मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाल्याने मूर्ती विक्री मध्ये ही वाढ आपेक्षित आहे. कलर सहित कच्च्या मालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मूर्तीमध्येही भाव वाढ करावी लागत आहे.
--- दतात्रय कुंभार (सर)
(मुर्ती कारागीर कवठेमहांकाळ )