NC Times

NC Times

बारामतीतून अजित पवारांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आता विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी१४ जुलै रोजी आपल्या मतदारसंघातून शक्तीप्रदर्शनाची सुरुवात केली. अजित पवारांनी बारामती येथे पक्षाचा राज्यव्यापी जन सन्मान मेळावा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांमध्ये नवी चेतना भरणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, लोकसभेचे एकमेव खासदार सुनील तटकरे, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यातील महिला सक्षम व्हायला हवी, असं मला आणि आमच्या महायुतीच्या सरकारला वाटतं. राज्यातील महिला आत्मनिर्भर व्हायला हव्यात, सरकारवर लोकांचा विश्वास असायला हवा. ‘मला माझ्या घरातील पुरुष मंडळींवर अवलंबून राहावं लागत नाही, मला दरवर्षी राज्य सरकारकडून १८ हजार रुपये मिळत आहेत’, या गोष्टीचं राज्यातील महिलांना समाधान वाटायला हवं. मी सर्वांना हेच सांगतो की आपल्या सरकारचं हे सातत्य आपण टिकवायला हवं आणि ते टिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा महायुतीचा विचार करावा लागेल. राज्यातील जनतेला ठरवावं लागेल की यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीला निवडून द्यायचं आहे.
अजित पवार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती निवडून आली तरच आपली ही योजना (मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना) पुढे कायम चालत राहील. आपलं (महायुतीचं) सरकार आलं तरच आपल्याला कायम पैसे मिळणार ही भावना लोकांमध्ये जागृत व्हायला हवी. आता निवडणुकीच्या काळात हौशे, नवशे, गवशे येतील, ते तुम्हाला काहीही सांगण्याचा प्रयत्न करतील. परंतु, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, हा अजित पवार शब्दाचा पक्का आहे. शब्द कुठेही बदलणार नाही. मी तुम्हा सर्वांना आश्वासन देतोय.
 अजित पवारांची विधानसभेसाठी जोरदार तयारी
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षापेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली असल्याचं या मेळाव्याच्या यानिमित्ताने पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले तर अजित पवार गटाचा एकच उमेदवार निवडून आला. त्यानंतर अजित पवार गटाने २०० कोटी खर्च करून निवडणुकीच्या प्रचारासाठी खासगी एजन्सी नेमली असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसह मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांनी शरद पवार गटाच्या आधीच निवडणुकीच्या प्रचाराला दमदार सुरुवात झाली आहे.