NC Times

NC Times

पंकजांनी पाथर्डी मतदारसंघात विधानसभा लढावी भाजप नेत्याचं पत्र


नवचैतन्य टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)- परळी (बीड) माझी आई आहेत तर पाथर्डी (नगर) माझी मावशी आहे, असे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे नेहमी सांगतात. परळीत अडचण असेल तर त्यांनी पाथर्डीतून निवडणूक लढविण्याची मागणी केली जाते. आता लोकसभा निवडणुकीत आईने नाकारल्याने पुन्हा एकदा मावशीने प्रेम व्यक्त केले आहे. आता पाथर्डी नव्हे तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी विधान सभेची निवडणूक लढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी अधिकृतपणे पक्षाच्या वरिष्ठांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. मुंडे यांचा बीडमध्ये ज्या पद्धतीने पराभव झाला, तो भरून काढण्यासाठी आम्ही नगरचे कार्यकर्ते एक जुटीने काम करून त्यांना विजयी करून हा दूर केला जाईल, असे ॲड. अभय आगरकर यांनी म्हटले आहे. नगर शहरातून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना चांगले मताधिक्य मिळालेले असल्याने भाजपसाठी विधानसभेला ही जागा अनुकूल असल्याचा दाखलाही ॲड. आगरकर यांनी यासाठी दिला आहे.
 बीडमधून मुंडे यांचा पराभव झाला. त्यांचा हा पराभव मराठी-ओबीसी संघर्षातून झाल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे मुंडे यांच्यासोबतच समाजातही याचे पडसाद उमटले आहेत. त्यातून मुंडे आणि एकूणच समाजाला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीत नगरमधून विखे पाटील यांचाही पराभव झाला. त्यांच्या प्रचारासाठीही मुंडे आल्या होत्या. विखे यांच्या नगर शहरातील प्रचाराची धुरा सांभाळणारे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष ॲड. आगरकर यांनीच आता मुंडे यांना नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी हालचाली करण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांनी पक्षाकडे यासंबंधी मागणी केली आहे.
ॲड. आगरकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंदीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. ॲड. आगरकर यांनी म्हटले आहे, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊन नये. नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. त्यासाठी त्यांनी नगर शहरात यावे. नुकत्याच झालेल्या लोककसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे नगर शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण आहे. ही विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यंनी बांधला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या सारख्या संघर्षशील व लढवैय्या नेत्रृत्वाला जर नगर मधून विधानसभेची उमेदवारी मिळाली तर त्या निश्चितच विजयी होतील. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून मुंडे यांना नगरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
 ॲड. अभय आगरकर यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांचाही संदर्भ दिला आहे. त्यांनी सांगितले, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कायम नगर शहरावर प्रेम केले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी नगर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याबरोबरच शहरातील गुंडगिरीलाही लगाम त्या काळात घातला होता. त्यांच्या कामाचा वारसा पंकजा मुंडे या पुढे नेत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवावी. अशी आमची पक्षश्रेष्ठींकडे मागणी आहे. यातून मुंडे यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला, त्याचीही भरपाई केली जावी, असाही उद्देश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा स्वयंसेवक म्हणून आपण जातीपातीला थार देत नाही. जातीपातीच अडकून पडल्याने हिंदूंची होणारी पिच्छेहाटही पाहू शकत नाही. त्यातूनच हा विचार पुढ आल्याचे ॲड. अभय आगरकर यांनी सांगितले.