NC Times

NC Times

महाराष्ट्रात भाजपला १० जागा लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले. नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रात भाजपला १० जागा मिळाल्या आहेत. भाजपने राज्यात २८ जागा लढवल्या होत्या. विजयी उमेदवारांमध्ये प्रामुख्याने नारायण राणे, पियूष गोयल, उदयनराजे भोसले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा समावेश आहे. महायुतीला ४८ पैकी १८ जागांवर यश आले आहे. यात शिंदेंच्या शिवसेनेचे सात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका खासदाराचा समावेश आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो !
इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले, या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
 उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगले यश मिळेल, असे वाटत होते. असे झाले असते, तर भाजपा स्वबळावर 310 च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मा. मोदीजींना साथ दिली आहे.
संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. पण, तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू.
महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो !