NC Times

NC Times

उद्धव ठाकरेंनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी-नवनीत राणा


नवचैतन्य टाईम्स अमरावती (प्रतिनिधी)-  नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. काँग्रेसच्या बळवंत वानखडे यांनी १९ हजार ७३१ मतांनी राणा यांचा पराभव केला. या पराभवानंतर, नवनीत राणा गुरुवारी (१३ जून) पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आल्या. यावेळी त्यांनी पराभवावर भाष्य केलं. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक आव्हानही दिलं. पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीत राणा या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या. त्यानंतर नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, अमरावतीच्या जनतेने मला का थांबवलं, याचा मी विचार करतेय.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पुढील चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करताना दिसतील”. त्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, ते स्पष्ट शब्दांत म्हणाले होते की आम्ही शपथ घेऊ आणि नरेंद्र मोदी यांना त्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देऊ. त्यावर मी एवढंच म्हणेन की दिवसा स्वप्न बघणाऱ्या उद्धव ठाकरेंना माहिती नाही की आम्ही महाराष्ट्रात किती काम केलं आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील जनता आम्हालाच प्रतिसाद देईल.
माजी खासदार राणा म्हणाल्या, “नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील मतांचं प्रमाण बघा. भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मतं मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पोपटाचं ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. तसेच उद्धव ठाकरे ज्या सुरात नरेंद्र मोदींना निमंत्रण देऊ असं बोलत होते, त्यांनी आता पाहिलं असेल की खरा वाघ कोण आहे. तसेच मला वाटतं की मी आता पराभूत झाले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता हनुमान चालीसा पठण करायला हवी.”
लोकसभेतील पराभवावर पहिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येणं टाळलं होतं. दरम्यान, या पराभवानंतर आता त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. राणा म्हणाल्या, “पाच वर्षांपूर्वी जनतेने मला अमरावतीचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला दिल्लीला पाठवलं होतं. परंतु, यंदा मला त्यांनी का थांबवलं, हे मला अजूनही समजू शकलेलं नाही. मात्र, हा पराभव म्हणजे शेवट नाही, गेल्या पाच वर्षांत मी प्रमाणिकपणे काम केलं आहे”
 दरम्यान, यावेळी राणा यांनी प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला. नवनीत राणा म्हणाल्या, “काही लोक मैदान जिंकण्यासाठी निवडणूक लढवतात, तर काही लोक दुसऱ्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करतात.”