NC Times

NC Times

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ६ जुलै रोजी साताऱ्यात पाच दिवस मुक्काम


नवचैतन्य  टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी साताऱ्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात पाच दिवस मुक्काम असणार आहे. या दृष्टीने प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. लाखो वारकऱ्यांचे लक्ष लागलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून आळंदीतून सुरू होणार आहे. हा सोहळा दि. ६ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात येणार आहे. यावर्षी सोहळ्याचे जिल्ह्यात पाच मुक्काम राहणार आहेत. तर ११ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
पालखी सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून प्रस्थान करत सोहळा पंढरपूरला जातो. दिनांक सहा जुलै रोजी पालखी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात लोणंद प्रवेश करणार आहे. रात्रीचा मुक्काम लोणंद येथे असणार आहे. तर दिनांक सात रोजीही लोणंद येथेच मुक्काम असेल. तर दिनांक  आठ जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन पालखी लोणंद येथून मार्गस्थ हेाईल.
 दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब तरडगाव (ता फलटण)येथे होईल , येथे वारीतील पहिले उभे रिंगण होईल. मुक्काम तरडगाव (ता. फलटण )येथे होणार आहे. दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा आणि विसावा वडजल (ता फलटण)येथे राहील. त्यानंतर रात्रीचा मुक्काम फलटण येथे राहणार आहे.
दिनांक दहा जुलै रोजी सकाळी फलटण येथून पालखीचे प्रस्थान होईल. सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, विसावा निंबळक फाटा येथे असेल. तर रात्रीचा मुक्काम बरड येथे असणार आहे. दिनांक अकरा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशासाठी बरड येथून पालखीचे प्रस्थान होईल. त्यानंतर सकाळचा विसावा साधबुवाचा ओढा तर दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ होईल. त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. सोलापूरमधील रात्रीचा मुक्काम हा माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे राहणार आहे.