NC Times

NC Times

अब की बार गडकरी सरकार? संघाचा नवा प्लॅन


नवचैतन्य टाईम्स नागपूर (प्रतिनिधी)-  लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाखाहून अधिक मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पराभव स्विकारावा लागला आहे.
स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपची धडपड सुरू असतानाच नितीन गडकरी पंतप्रधान होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. योगायोगाने त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आरएसएसचे मुख्यालयही आहे. यावर्षी गडकरी नव्या संकल्पासह प्रचारात उतरले होते. त्याचा फायदा येथे त्यांना झालेला दिसतो.
 नितीन गडकरी हे भाजपचे एक असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळू शकतो. शिवसेना उबाठाही नितीन गडकरींच्या नावाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा पंतप्रधान या अटीवर शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एनडीएसोबत येऊ शकतो. यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या एकूण रणनितीला छेद देता येईल. त्यामुळे संघ नरेंद्र मोदी नाही तर यंदा गडकरी सरकार आणण्याचा विचार करु शकतो अशी चर्चा आहे.
 निवडणुकीनंतर, संजय राऊत यांनी गडकरींवरुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. फडणवीसांना नितीन गडकरींना पराभूत करायचं होतं असं ते म्हणाले होते. त्यामुळे एकूणच विरोधक हे गडकरींना पाठिंबा देऊ शकतात असं मानलं जात आहे.
 २०१४ मध्ये जेव्हा नितीन गडकरींनी पहिल्यांदा नागपूरची जागा जिंकली, तेव्हा त्याचे श्रेय काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी मोदी लाटेला दिले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव केला. पण, २०१४ च्या तुलनेत त्यांच्या मताधिक्क्यामध्ये घसरण झाली होती. आथा तिसऱ्या टर्मच्या आव्हानाचा सामना करताना गडकरींवर केवळ जिंकण्याचेच नव्हे तर विजयाचे अंतर वाढवण्याचेही दडपण होते. निवडणुकीपूर्वी गडकरींनी 'काम करणाऱ्यांना कमी प्रसिद्धी मिळते,' अशी टीका केली होती.
भाजप बहुमताचा आकडा गाठण्यात कमी पडल्याने, नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या कार्यकाळावर प्रश्न निर्माण होतात दिसत आहे. विशेषत: त्यांनी कधीही अल्पमतातल्या सरकारचे नेतृत्व केलेले नाही. लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक निकालानंतर संघ यावर विचार करु शकते.