NC Times

NC Times

विस्तारित म्हैसाळ योजनेचे कार्यालय जत येथे स्थलांतरित करा -मा.तम्मनगौडा रवी पाटील


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ, वार्ताहर(विजय चौगुले)-
दुष्काळी जत तालुक्यासाठी लाईफ लाईन ठरणारी आणि कृष्णा खोरेकडे सध्या सर्वात मोठ्या रक्कमेची असणारी म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम गतीने सुरु आहे. परंतु याचे कार्यालय मात्र सांगलीत आणि काम जतेत अशी स्थिती आहे. त्यामुळे हे कार्यालय जत येथे तातडीने स्थलांतरित करावे, अशी मागणी भाजपचे जत निवडणूक प्रमुख तथा केंद्रीय रस्ते वाहतूक समितीचे संचालक तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे.
या संदर्भात त्यांनी सांगली येथे नुकतेच अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांच्याशी चर्चा करून , तसा पत्र व्यवहार केला आहे. शिवाय सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून कृष्णा नदीच्या पुराचे पाणी गतवर्षी प्रमाणे जत भागासाठी वळवावे, अशी मागणी देखील केली आहे. 
रवी पाटील म्हणाले, जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस  यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेचे दोन्ही टप्प्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात ही झालेली आहे.
जतच्या वंचित 65 गावांसाठी ही योजना  संजीवनी ठरणार आहे. या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे. जत तालुक्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद महायुती शासनाने केली आहे. अशा परिस्थितीत या योजनेचे नियोजन करणारी यंत्रणा व कार्यालय ही सांगली येथून कार्यरत आहेत. 
परंतु सांगली ते जत व जत पूर्वभाग हे अंतर शंभर ते दीडशे किलोमीटर एवढे आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी हे सांगली येथे राहत असतात. त्यामुळे या योजनेचे काम प्रभावीपणे व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी या योजनेचे कार्यालय हे जतमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. कामे जतमध्ये आणि कार्यालय सांगलीमध्ये ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे. 
त्यामुळे जत विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यालये तातडीने जत येथे हलवण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 
 325   कोटीची कामे पूर्ण                                                 काम जतेत अन कार्यालय सांगलीत 
पुराच्या पाण्याचे नियोजन व्हावे 
रवी पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे फडणवीस  सरकारने म्हैसाळ विस्तारीत योजनेला मंजुरी देत 1028 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर केले आहेत. यातील बेडग ते येळदरी पहिला टप्पा असून, यापैकी 325 कोटीची कामे पूर्णत्वास गेली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात 989.35 कोटी कामाचे टेंडर प्रक्रिया राबवली आहे.  ही कामे देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू होणार आहेत. या दोन्ही कामाचे उद्घाटन देखील मोठ्या प्रमाणात घेण्याचे नियोजन करीत आहोत. 
तसेच आता पावसाला सुरुवात झाली आहे. कृष्णा नदीतून मोठ्या प्रमाणात  अतिरिक्त पाणी कर्नाटक मध्ये वाया जाते, हेच पाणी  जत तालुक्याकडे वळवावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे.