NC Times

NC Times

दादा गटाच्या आमदारांना विधानसभा निवडणुकीची धाकधूक, दादांपुढे आमदारांनी काय सांगितलं?


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी आज दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात बोलावलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत धाकधूक व्यक्त केल्याचे सूत्रांनी सागितले.
 लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नेत्यांमध्ये पसरलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक गुरुवारी पार पडली. गुरुवारी दुपारी पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांची बैठक अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. ज्यात लोकसभा निवडणुकीच्या निराशाजनक कामगिरीचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पंचतारांकित हॉटेलात पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात बसलेल्या फटक्याची हकीकत आमदारांनी मांडली. तर आगामी निवडणुकीबाबत धाकधूक असल्याचेही अनेक आमदारांनी पवारांसमोर बोलून दाखवल्याचे कळते.
अशीच परिस्थिती राहिली तर....
राष्ट्रवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत पाच जागा लढविल्या, ज्यातील परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना दिली होती. मात्र, रायगड येथून सुनिल तटकरे वगळता अन्य ठिकाणी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. तसेच, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मताधिक्य मिळवल्याने नेत्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. विधानसभा निवडणूक तीन ते चार महिन्यांवर आली असताना लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम कायम राहिल्यास आपली जागा धोक्यात आल्याने आमदार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
 काळजी करू नका, तुम्ही कामाला लागा, दादांच्या सूचना
आमदारांच्या या अस्वस्थेमुळेच अजित पवार यांनी शुक्रवारी आयोजित केलेली आमदारांची बैठक गुरुवारी बोलावली. हॉटेल ट्रायडंटमध्ये झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचा लेखाजोखा अजित पवारांना दिला. अनेक आमदारांनी या बैठकीत निवडणुकीत असलेली मविआची हवा आणि ठाकरे-पवार यांच्या वाढलेल्या प्रभावाविषयी चिंता व्यक्त केली. यावर अजित पवार यांनी आमदारांना, आतापासून विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याची सूचना केली. तसेच, पक्षाची तसेच राज्य सरकारची भूमिका अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचविण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी केली.
 दरम्यान, गुरुवारी दुपारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यात पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी निवडणुकीत झालेल्या पराभवाला पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यात आलेले अपयश आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना छेद देता न आल्याने पराभव झाल्याची चर्चा झाली. आमदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.
सहा आमदार गैरहजर
आमदारांच्या बैठकीला नवाब मलिक, राजेंद्र शिंगणे, नरहरी झिरवळ, धर्मराव बाबा आत्राम, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे हे सहा आमदार अनुपस्थित होते. यातील मलिक यांच्या अनुपस्थितीविषयी पक्षाकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही तर झिरवळ आणि शिंगणे हे देशाबाहेर असल्याचे. आत्राम प्रकृती अस्वस्थ्यामुळे तर बनसोडे हे कौटुंबिक कारणांमुळे अनुपस्थित राहिल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुणे अपघातामुळे वादात सापडलेल्या टिंगरे यांनी बैठकीपासून दूर राहणे पसंत केले. या सर्व आमदारांनी पवार यांना गैरहजेरीविषयी आधीच कळविले होते. एकही आमदार नाराज नाही, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.