NC Times

NC Times

पतीने लॉजच्या रुमला कुलूप लावून पत्नीच्या गळ्यावर वार पुण्यातील धक्कादायक घटना


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-घरगुती वादातून पतीने धारदार चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खून करून पती लाॅजला कुलूप लावून पळून गेला. या प्रकरणी पोलिसांनी पतीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पतीने घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल
काजल कृष्णा कदम (वय २७) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कृष्णा कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल आणि कृष्णा मजुरीचे काम करीत होते. दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. मात्र, दोघांनी पुन्हा एकत्र राहण्याचा विचार केला होता.
या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते शनिवारी दुपारी भारती विद्यापीठ परिसरातील अश्विनी लाॅजमध्ये गेले. दोघांनी तेथे मद्यपान केले. नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. कृष्णाने काजलच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. या घटनेनंतर खोलीला कुलूप लावून तो फरार झाला.
काही वेळाने त्याने मित्राला पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. मित्राने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लॉजमध्ये जाऊन खोलीचे कुलूप तोडले असता काजल मृत अवस्थेत आढळून आली.