नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- आटपाडी शहरामध्ये प्रत्येक शनिवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारामध्ये विक्रेत्यांकडून कर स्वरूपामध्ये पैसे वसूल केले जातात. मात्र हे पैसे वसूल करत असताना नियमाचे पालन केले जात नाही. असे उघडकीस आले आहे. आठवडा बाजारामध्ये विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत असताना बसपाचे तालुकाध्यक्ष संतोष हेगडे यांच्या लक्षात हा प्रकार आला.
शनिवारी संतोष हेगडे बाजारात बाजार करण्यासाठी गेले असता एक खाजगी इसम विक्रेत्यांकडून नगरपंचायतीचा कर म्हणून प्रत्येक विक्रेत्यांकडून पैसे वसूल करत होता. मात्र विक्रेत्यांना त्यांनी घेतलेल्या पैशाची पावती देत नव्हता. याबाबत त्या कर वसूल करणाऱ्या खाजगी एजंटला विचारले असता तो काय म्हणत आहे हे आपण पाहूया.
कर वसूल करणारी व्यक्ती पैसे घेतल्यानंतर पावती देत नसल्याने सदर व्यक्तीला पावती देण्यासाठी आग्रह केला तर त्यांच्याकडून दमदाटी करून त्या विक्रेत्याला त्रास दिला जातो. अशा अनेक तक्रारी विक्रेत्यांकडून केल्या जात आहेत.
पावती दिली जात नाही तर कर देणार नाही असं एखाद्या विक्रेत्यांनी म्हटलं तर त्याच्यासोबत ही दूर व्यवहार केला जातो.
खुलेआम सामान्य नागरिकांची लूट केली जात आहे याबाबत बसपाचे तालुकाध्यक्ष संतोष हेगडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली आहे.
अवैधपणे कर वसुली केली जात आहे याबाबत आम्ही आटपाडी नगरपंचायतीचे अमर बंडगर यांच्याशी अनेक वेळा मोबाईल वरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप पर्यंत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
कोणत्याही व्यक्तीकडून पैसे घेतले जातात तेव्हा त्या व्यक्तीला रीतसर पावती देणे अनिवार्य आहे. परंतु या ठिकाणी कोणतीही पावती दिली जात नाही शिवाय ही वसुली नगरपंचायतीसाठी केली जात आहे. जर अशा पद्धतीने विना पावती वसुली होत असेल तर प्रत्येक बाजारामध्ये किती वसुली झाली याचा अधिकृत हिसाब कसा लावता येणार. कायदेशीर दृष्ट्या कर वसुलीची चौकशी करायची असेल तर जेवढ्या पावत्या दिल्या आहेत तोच हिसाब अधिकृत मानला जातो. मग बेकायदेशीरपणे विना पावती घेतलेले पैसे हे कोणाच्या खिशात जात आहेत आणि हा प्रकार किती दिवसापासून चालू आहे. आत्तापर्यंत नगरपंचायतीसाठी या भोंगळ कारभाराचा किती मोठा फटका बसला आहे ही बाब सुद्धा लवकरच उघड होणार आहे.