NC Times

NC Times

देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम सोलापुरात दंगल घडविणार होते-खासदार प्रणिती शिंदे


नवचैतन्य टाईम्स सोलापूर प्रतिनिधी (राहुल सावंत)- नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव केला. राज्यातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतींपैकी सोलापूरची एक होती. यात प्रणिती शिंदेंनी बाजी मारली. निकालानंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने कृतज्ञता सोहळा शनिवारी संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रणिती शिंदेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
जामगुंडी मंगल कार्यालयात काँग्रेसचा हा कृतज्ञता सोहळा सुरेश हासापुरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. प्रणिती शिंदे यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाल्याबद्दल दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना प्रणिती शिंदेनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ सोलापुरात दंगल घडविणार होते. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने भाजपचे षडयंत्र फसले,अशी तोफ डागत प्रणिती शिंदे भाजपवर बरसल्या.
 माझे नेतृत्व काही पुढाऱ्यांना मान्य नाही, त्यामुळे...
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाषण करताना म्हणाले,प्रणिती या खासदार झाल्या आहेत.तिला एकटीला लोकांत जाऊन काम करावे लागणार आहे.मी आणि माझी बायको आता,घरी बसू असे सांगितले.मात्र प्रणिती शिंदेंनी भाषण करताना, मी शिंदे साहेबांना सोबत घेऊनच काम करणार आहे.आजही अनेक नेत्यांना माझे नेतृत्व मान्य नाही,त्यामुळे अजून शिंदे साहेबांना सोलापुरातील लोकांत राहून काम करायचे आहे, असे सांगत मनोगत व्यक्त केले.
त्यांना माहीत होतं निवडणूक हातातून गेलीय; फडणवीसांचा प्लॅन फसला
 देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता. त्यांना माहीत होते की, निवडणूक त्यांच्या हातून गेली म्हणून ही कट कारस्थाने त्यांनी केली. त्यांची मतदानाच्या पाच दिवस अगोदरची भाषणे काढून बघा, त्यांच्या हालचाली तशाच होत्या, मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले म्हणून प्रसंग टळले अशी तोफ डागत प्रणिती शिंदेनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.