नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)- वंचित बहुजन आघाडी सोबतच्या वाटाघाटींमध्ये महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा महत्वाचा असा एक महिना निघून गेला. शेवटी वंचितकडून स्पष्ट अशी कुठलीच मागणी झाली नाही परंतु, महाविकास आघाडीचा वेळ वाया गेला. या अनुभवाला गाठीशी ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितसोबत चर्चाही करायची नाही, अशी भूमिका सध्यातरी महाविकास आघाडीने घेतली आहे. वंचितने कुठलाही प्रस्ताव ठेवला तरीही त्याचा विचारही करण्यात येणार नाही, असे आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतर्फे सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविण्यात आले. अनेक अटी-शर्ती ठेवून अखेर वंचितचे नेते महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले. परंतु, संपूर्ण फेब्रुवारीचा महिना जागा वाटपा वरुन चर्चा करण्यातच गेला. त्यातही वंचितकडून नेमक्या किती जागा हव्या, याचा थांगपत्ता महाविकास आघाडीला लागू दिला नाही.
वाटाघाटी सुरू असतानाच वंचितने आपण २७ जागांवर चाचपणी करत असल्याचेही जाहीर केले तर अखेर आपल्याला सन्मान जनक वागणूक देत नसल्याचे सांगत वंचितने एक-एक करत राज्यात ३६ हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले. विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या असून महाविकास आघाडीने या निवडणुका एकत्रितच लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीतील एका ज्येष्ठ नेत्याला वंचितच्या संभाव्य समावेशाबद्दल विचारले असता, त्यांनी वंचितसाठी महाविकास आघाडीची दारे बंद असल्याचे स्पष्ट केले. वंचितने वाटाघाटी दरम्यान तब्बल एक महिना आम्हाला गुंतवून ठेवले. त्यांच्या मागण्या अतिशय अवास्तव होत्या, असे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर पत्रकाराना सांगितले. त्यामुळे काही उमेदवारांना तयारीसाठी वेळही कमी मिळाला तर काही ठिकाणी उमेदवारांची निवड चुकल्याने त्या जागा गमवाव्या लागल्या, असेही या नेत्याने स्पष्ट केले.
त्यातच वंचितला या निवडणुकीत जनतेकडून अल्प प्रतिसाद मिळाला असून पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. बेचेन झालेल्या वंचितसोबत पुन्हा चर्चेच्या फेऱ्यांत अडकण्यापेक्षा आगामी विधानसभेत वंचित बाबत विचारही करायचा नाही याविषयी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सध्यातरी एकमत असल्याचे या नेत्याने अधोरेखित केले असल्याचे स्पष्ट होत आहे.