NC Times

NC Times

राज ठाकरे यांच्या सभेने ठाण्याच्या पालकमंत्र्यांचा आत्मविश्वास वाढला


नवचैतन्य  टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना राज साहेबांनी पाठिंबा दिला आहे, आमच्या विचारांची ताकद आता आणखी वाढलेली आहे. हीच ताकद महायुतीसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं वक्तव्य ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केलं आहे.
ठाणे आणि कल्याणच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे आपल्या ठाकरे बाण्यात महायुतीच्या जाहीर सभेतून जनतेला आवाहन करणार आहेत. त्याआधी ठाकरेंनी शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघेंना अभिवादन करुन आशिर्वाद घेतले आहेत, आता ते थोड्याच वेळात व्यासपीठावर उपस्थिती लावणार आहेत.
दरम्यान राज ठाकरे येणं ही आमच्यासाठी पर्वणी असून बाळासाहेब ठाकरेंचं ज्वलंत हिंदुत्व घेऊनच आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंचे विचार सारखेच आहेत. हिंदुत्ववादी विचारांच्या ताकदीमुळे महायुती अधिक भक्कम होणार असून प्रचंड बहुमताने महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येणार, असा विश्वास देखील शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्याचा पालकमंत्री असून माझ्यासह शिवसेना आणि मनसेचे सर्व नेते सभेला उपस्थित राहणार आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या सर्व नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असे माहिती देत 'ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यातच राहणार आहे' हे सांगून महाविकास आघाडीतील नेत्यांना सावध केले आहे.
 राज ठाकरे ठाण्यात दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या कळव्यातील सभेसाठी ठाण्यात दाखल झाले आहेत. टेंभी नाका येथे आनंदाश्रमात ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. ठाकरे यांच्यासह महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्याशी आनंदाश्रमात बंद दाराआड चर्चा करून ठाकरे सभास्थळी रवाना झाले आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेना-मनसेचे पदाधिकारी उपस्थित यावेळी उपस्थित आहेत.