NC Times

NC Times

निलेश लंकेला पाडण्यासाठी दिल्लीवरून माणसे आणावी लागतात - सुप्रिया सुळे


नवचैतन्य टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)-  लोकसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांच्यासाठी मते मागण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी इंडिया आघाडीला धन्यवाद देते. या निवडणुकीत आम्ही जी मेहनत घेतोय, कदाचित त्यापेक्षा जास्त मेहनत काँग्रेस आणि शिवसेना घेत आहे. त्यामुळे आता लंके यांचा विजय निश्चित आहे. त्यांनी दिल्लीची बॅग भरून तिकीट लगेच बुक करावे असे मला वाटत आहे,’ असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
 महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी शेवगाव तालुक्यात सभा झाली. त्यावेळी सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील होते.
 यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, ‘आपण कुणासाठी मते मागतोय हेही महत्वाचे असते. सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण लंके यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे आहे. देशाला लंके यांच्यासारख्या खासदाराची गरज आहे,’ असेही सुळे म्हणाल्या.
 त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंबंधी सुळे म्हणाल्या, ‘आमच्यावर अनेक आरोप झाले. मी त्याची फार काळजी करत नाही. कारण आमचे मन साफ आहे. आम्ही कोणतीही गोष्ट कुणाचा अपमान करण्यासाठी करत नाही. तसेच आम्ही इतिहासातही रमत नाही. गेली वीस वर्षे अनेक आरोप झाले. त्याची उत्तर आज मिळाली तर कांद्याला भाव मिळणार आहे का? कापसाला भाव मिळणार आहे का ? देशातला भ्रष्टाचार कमी होणार आहे का ? महागाई कमी होणार आहे?’ असे प्रश्‍न सुळे यांनी उपस्थित केले.
 प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘लंके यांची उमेदवारी निश्‍चित झाली, त्याच दिवशी महाविकास आघाडीचा विजय झाला असे मी समजतो. आता लंके संसदेत सुप्रिया सुळे यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करतील. सध्या सामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. खते आणि शेतीची औजारे खरेदी करताना शेतकऱ्याला जीएसटी भरावा लागत आहे. देशात गरीबांसाठी काही मोफत राहिलेले नाही. विविध करांमुळे सर्वांना प्रचंड त्रास होत आहे’, असेही पाटील म्हणाले.
 पक्ष फुटीसंबंधी पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी आमच्या पक्षावर भोपाळमध्ये टीका केली. पक्षावर टीका केल्याने आम्ही उत्तर देण्याची तयारी करीत होतो. मात्र चारच दिवसांत आमचे ९ सहकारी शपथ घेउन मोकळे झाले. ४० ते ४२ आमदारही तिकडे गेले. मात्र, मोदी यांनी असा आरोप केला नसता तर आमचा पक्ष स्वच्छ झाला नसता. त्यामुळे मोदी यांचे आभारच मानले पाहिजेत. या मतदारसंघात लंकेंसारख्या एका छोटया, साध्या, शेतकरी कुटूंबातल्या माणसाला पाडण्यासाठी इतकी माणसे दिल्लीवरून आणावी लागली. यातच लंकेंचा विजय आहे. त्यांनी कितीही पैसा ओतला तरी नगरची जनता त्यांचा स्वाभिमान विकणार नाही. कुणाच्याही प्रभावाखाली न येता लंके यांना दिल्लीला पाठविल्याशिवाय राहणार नाही,’ असेही पाटील म्हणाले.