NC Times

NC Times

माझ्या शिवसेनेला जे नकली म्हणतात ते बेअकली-उध्दव ठाकरे


नवचैतन्य टाईम्स सिंधुदुर्ग प्रतिनिधी(दिनेश कुडाळ)-सिंधुदुर्गातील गद्दाराने धमकी दिली होती. कोकणात येऊन दाखव. तू येऊन बघ तुला गाडून दाखवतो की नाही. कोकणात माझी माणसं तुला गाडून टाकतील. अमित शाह तिथे आले. म्हणाले ही नकली सेना आहे. त्यानंतर मी कोकणात गेलो. मग मी त्यांना जे बोललो ते सांगतो. जे माझ्या शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली आहे. हे माझे वैभव आहे. ही माझी संपत्ती आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट अमित शाह आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. तसेच ओमराजेंना निंबाळकरांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी मतदारांना केले आहे. ते धाराशिवमध्ये सभेत बोलत होते.    महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा धाराशिवमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. तसेच महायुती आणि महाविकास आघाडी, लोकसभा निवडणूक अशा विषयांवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी भाषणातून विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.
 उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही घटनेला हात लावून पाहा. ज्या दिवशी घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटल्याशिवाय राहणार नाही. देशातील लोकं काय गुरंढोरं आहेत का? एकदा मूर्ख बनवाल. काही जणांना सदैव मूर्ख बनवाल. पण सारखं मूर्ख बनवू शकत नाही. कारण जनतेला आता जाग आली आहे. प्रत्येकवेळी निवडणूक आल्यावर हिंदू मुस्लीम दंगे लावले जातात. तसंच इंडिया आघाडी जिंकली तर पाकिस्तानला आनंद होईल म्हणून सांगतात. आमच्यापैकी कोणी तरी न बोलावता नवाज शरीफचा केक खाऊन आले का? आमच्यापैकी कोणी तरी जीनाच्या कबरीवर जाऊन आले का? असा सवाल विचारत ठाकरेंनी हा भांडणं लावण्याचा प्रकार असल्याचे सांगितलं.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर सडकून टीका केली आहे. ठाकरे म्हणाले की, अमित शाह तुमच्यात हिंमत तर नाही. मात्र तुमच्यात लाज असेल तर जनतेच्या प्रश्नावर बोला. धाराशिवकरांना कधी पाणी देणार. मोदीजी तुम्ही तुमच्या दहा वर्षातील कामे जनतेसमोर ठेवा. मी अडीच वर्षातील कामे ठेवतो. तुम्ही जिंकला तर मी घरी बसेन, असं म्हणत मोदींना खुलं आव्हानच ठाकरेंनी दिलं आहे. ईडी कारवाया करून आमच्या लोकांना सतावलं. त्याचा हिशोब व्याजासह परत केल्याशिवाय राहणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४०० पार कशाला करायचे आहेत. संविधान बदलायला का? एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने हे संविधान लिहिलं आहे. म्हणून त्यांना ते बदलायचं आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान त्यांना पचत नाही. हे यांचं गोमूत्रधारी हिंदुत्व, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींना धारेवर धरलं. तसेच नुसतं बाळासाहेब म्हणून नका, हिंदूहृदयस्रमाट म्हणा. हिंदूहृदयसम्राट म्हणायला जीभ का कचरते? असा सवाल ठाकरेंनी मोदींना केला आहे.