NC Times

NC Times

दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न.. राजकारणात नावावरून झालेल्या ट्रोलिंगवर दिपाली सय्यद बेधडक बोलली


नवचैतन्य  टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-लोकप्रिय मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद गेली २५ वर्ष अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. ती अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. अभिनेते भरत जाधव यांच्यासोबतची तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. या सोबतच त राजकारणातदेखील सक्रीय झाली. तिने राजकारणात प्रवेश करत हाती शिवबंधन बांधलं होतं. सध्या ती शिंदे गटाच्या शिवसेनेत आहे. लवकरच दिपाली 'रुद्रा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने दिलेली मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या मुलाखतीत ती राजकारणात आल्यानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल बोलली आहे. तेव्हा आपल्याला त्या ट्रोलिंगचा प्रचंड त्रास झाला होता असं ती म्हणाली आहे.
इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिपालीने तिला झालेल्या ट्रोलिंगबद्दल सांगितलं. ती म्हणाली, 'कलाकार हा खूप भावनिक असतो. आणि तो जेव्हा उतरतो ना तेव्हा व सच्चाईने उतरतो. त्याला जे काही करायचय ना त्यासाठीच उतरतो. मला सुरुवातीला काहीच इंटरेस्ट नव्हता खरं तर. पण आपचं तिकीट आलं. सगळ्यांनी सांगितलं तुझ्यात ते गुण आहेत, तू करू शकते, तू कर. एकदम शेवटच्या क्षणाला मी हो म्हटलं. आणि बाप रे बाप, तेव्हा पहिल्यांदा मी ट्रोलिंगला सामोरी गेले. आज मी जेवढं सांगतेय ना की ट्रोलकडे लक्ष देऊ नका तेव्हा मी लक्ष दिलं होतं. आणि तेव्हा मी भर पत्रकार परिषदेत रडले होते. कारण इतकं ट्रोलिंग झालं होतं. एकतर माझ्या नावाला घेऊन ट्रोलिंग झालं होतं, मी मुसलमान व्यक्तीशी लग्न केलंय म्हणून ट्रोलिंग झालं होतं. 
दिपाली पुढे म्हणाली, 'तुला खूप मजबूत व्हावं लागणार आहे. तुला तुझ्या हृदयाला इतकं निगरगट्ट बनवायला लागणार आहे ना, दगड बनवावं लागणार आहे. पण आता मी ट्रोलर्सकडे लक्षच देत नाही. जितके तुम्ही त्या कमेंट वाचणार तेवढं तुम्हाला त्रास होणार. काही काही तर माणसं त्यासाठीच बसवलेली असतात, ट्रोलिंग करण्यासाठी. ट्रोलर काय आहेत, त्यांना काही काम नाहीये. आजकाल गरीब आणि श्रीमंत दोघांकडेही मोबाईल आहे. सगळ्यांकडे काही नसेल तरी चालेल पण मोबाईल आहे. प्रत्येकाचं डोकं ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने ते टाइप करतात. त्यांच्याकडे मी आता लक्ष देत नाही. असं दिपाली म्हणाली.