NC Times

NC Times

ठाकरे तुम्हाला लाज कशी वाटत नाही? केतकी चितळेचा सवाल


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-सध्या देशात निवडणुका सुरू आहेत. प्रचार सभांचा धुरळा उडाला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःचा प्रचार करण्यात गुंतला आहे. विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र अशातच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे हिने एक पोस्ट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाला असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. त्याला अनुसरून केतकीने चक्क तुम्हाला लाज वाटत नाही का असा प्रश्न विचारला आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
केतकीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने कीर्तिकर आणि ठाकरेंचा उल्लेख केला आहे. याबद्दल तिने लिहिलं, 'लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तीकरांना तसेच मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीयेत; येते आहे ती फक्त कीव.' केतकीची ही इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर वायव्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाला होता आणि तो कीर्तीकर यांच्याबरोबर आहे, असा गंभीर आरोप भाजपाने केला होता. त्यावरून तिने ही पोस्ट केली आहे. मात्र कीर्तिकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर जर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तर मग तो बाहेर कसा? असा प्रश्न ठाकरे गटाचे वायव्य मुंबईतील निवडणूक प्रतिनिधी राजेश शेट्ये यांनी उपस्थित केला होता.