NC Times

NC Times

कोकणातील ६१३ गावं दरडप्रवण, तीन जिल्ह्यांतील ५४ गावे अतिसंवेदनशील


नवचैतन्य टाईम्स रत्नागिरी प्रतिनिधी (योगेश कुडाळ)-कोकणात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो. यापूर्वी अशा अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. विशेषतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात या घटना घडण्याचं प्रमाण अधिक आहे. पावसाळा तोंडावर आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे कोकणातील काही गावात भय इथले संपत नाही....अशीच परिस्थिती यावर्षीच्या पावसाळ्यातही राहण्याची शक्यता आहे. कोकणातील सात जिल्ह्यांतील ६१३ गावे दरडप्रवण आहेत. या गावांपैकी २९९ गावांचे भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या आजपर्यंतच्या प्राप्त अहवालानुसार मुंबई उपनगर, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील ५४ गावे अतिसंवेदनशील श्रेणीत आहेत. कोकणातील या गावांच सर्वेक्षण प्रशासनाकडून पूर्ण झालं आहे.
राज्याच्या पश्चिम किनारपट्टी लगतच्या डोंगररांगांमध्ये भूस्खलन होण्याचे प्रमाण जास्त आहे. या संपूर्ण किनारपट्टीच्या भागात अधिक पाऊस पडतो. डोंगररांगांमध्ये दगडांची धूप होत असल्यामुळे गाळ तयार होतो. हा गाळ डोंगरउतारावर जमा होत असतो. अतिवृष्टी होते, तेव्हा पाणी मुरल्यामुळे पाण्याचा दाब तयार होतो.
  या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा गाळ अतिरिक्त भार निर्माण करतो. ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो, तेथे निर्माण होणाऱ्या निसटत्या पृष्ठभागावरून त्याची घसरण्याची प्रक्रिया सुरू होते. कोकणातील रायगड जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण असून या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रायगडमधील ९ गावे अतिधोकादायक, ११ गावे मध्यम धोकादायक व ८३ गावे सौम्य धोकादायक श्रेणीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील ३६ गावे. तर पालघर जिल्ह्यातील ५४ गावे दरडप्रवण आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मुंबई शहर विभागात १७ गावे अथवा ठिकाणे दरडप्रवण असून या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले आहे.
 १७ गावे मध्यम धोकादायक; १२२ गावांचे सर्वेक्षण
ही १७ गावे मध्यम धोकादायक श्रेणीत आहेत. मुंबई उपनगरमध्ये ५७ गावे ठिकाणे दरडप्रवण आहेत. या सर्व गावांचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण झाले असून यातील ४० गावे अतिसंवेदनशिल श्रेणीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक दरडप्रवण गावे आहेत. येथे ३०३ गावे दरडप्रवण असून १२२ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील ५ गावे अत्यंत धोकादायक श्रेणीत, ९ गावे मध्यम धोकादायक, ४९ गावे कमी धोकादायक श्रेणीत आहेत. ४१ गावे चौथ्या तर १८ गावे धोकादायकच्या पाचव्या श्रेणीत आहेत.
रायगड जिल्हयात १०३ गावे दरडप्रवण
१८१ गावांच्या सर्वेक्षणासाठी ४ ऑगस्ट २०२३ रोजी कळवण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. कोकणातील रायगड जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण असून या सर्व गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. रायगडमधील ९ गावे अतिधोकादायक, ११ गावे मध्यम धोकादायक आणि ८३ गावे सौम्य धोकादायक श्रेणीत आहेत.