NC Times

NC Times

ठाणे लोकसभेच्या बालेकिल्ल्यासाठी दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच


नवचैतन्य टाईम्स मुंबई  प्रतिनिधी(नेहाल हसन)- शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला अशी ओळख असलेला आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला ‘ठाणे लोकसभा’ मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. हा बालेकिल्ला स्वतःकडेच राखण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे. येथे आपला 'भगवा झेंडा' फडकण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजन विचारे व शिवसेनेचे नरेश म्हस्के मैदानात उतरले आहेत. दोन्हीकडून निष्ठावान, गद्दार, खोके, धोके या भावनिक मुद्द्यांवर प्रचाराची राळ उठवली असतानाच सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे मात्र काणाडोळा होत आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यावर यंदा कोणत्या शिवसेनेचा झेंडा फडकणार, या निकालावर विधानसभेच्या निवडणुकांची गणिते ठरणार असून शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
 ठाणे लोकसभेत एकूण २४ लाख ०९ हजार ५१३ मतदारांपैकी १३ लाख ३९ हजार ५९० पुरुष व ११ लाख ५० हजार ७१६ स्त्री मतदार आहेत. मतदारसंघात मराठी भाषिक १२ लाख ९५ हजार ०६६, उत्तर भारतीयांची संख्या ५ लाख ४७ हजार ९१२, मुस्लिम समाजाची २ लाख ९८ हजार ८६१ इतकी संख्या असून गुजराती मतदार १ लाख ७४ हजार ३७५, पंजाबी, सिंधी मतदार ४९ हजार ८१० व इतर मतदार ४९ हजार ८१४ इतके असल्याने संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ अशी ठाण्याची ओळख आहे.
शिवसेनेत फूट, मतदार कुणाकडे झुकणार?
सलग दोन वेळा खासदार झालेल्या राजन विचारे यांना यंदा भाजपची साथ लाभणार नसल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. तर शिवसेनेला या ठाण्याने पहिली सत्ता दिली, आता त्या ठाण्यातून शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यांमुळे मतदार कुणाकडे झुकणार, याची उत्सुकता आहे.
गेल्या आठ निवडणुकांची गोळाबेरीज केल्यास २००९ मध्ये झालेल्या एका लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता ठाणे लोकसभेवर सलग शिवसेनेचाच भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या या अभेद्य बालेकिल्ल्याला २००९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या संजीव नाईक यांनी भेदले होते. मात्र आता हेच संजीव नाईक भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. खुद्द संजीव नाईकच यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक होते. त्यामुळे महायुतीकडून म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईक कुटुंबीयांच्या नाराजी नाट्याची चर्चा रंगली. मात्र वरिष्ठ नेत्यांनी काढलेल्या समजुतीनंतर या वादावर तूर्तास पडदा पडला आहे. नवी मुंबई शहरातील नाईकांच्या प्रत्यक्ष निवडणुकीतील सक्रिय सहभागावरच म्हस्के बेरजेच्या राजकारणात यशस्वी ठरू शकतात.
मुख्यमंत्र्यांचे नेटवर्क, विचारे यांचा अनुभव
ठाणे लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघांत महायुतीचे प्राबल्य असल्याने म्हस्के यांची उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहीर होऊनही त्यांनी प्रचारात जोर धरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्राउंड नेटवर्क, हातातोंडाशी आलेली उमेदवारी निसटल्यानंतरही भाजपने मोदी यांच्या ‘४०० पार’साठी मतदारसंघात सुरू केलेली मेहनत आणि मित्रपक्षांच्या पाठबळाच्या बळावर म्हस्के मतदारसंघ पिंजून काढत असले तरी दोन टर्मचा अनुभव आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवत विचारे यांनी प्रचाराचा तिसरा टप्पा सुरू केला आहे.
मनसेची चर्चा
ठाणे लोकसभेंतर्गत येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये मनसेच्या लोकप्रतिनिधींची संख्या तोळामासा आहे. तर ठाणे शहरातही मनसेची ताकद मर्यादित आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ नुकतीच कळव्यात जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरे यांनी परप्रांतीय मुद्द्याला हात घालत ठाण्यासह आजूबाजूच्या शहरामध्ये बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांना लक्ष्य केले. त्यामुळे परप्रांतीय मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेला विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.
 मुस्लिम मते निर्णयक
ठाणे लोकसभेत तब्बल पावणे तीन लाख मुस्लिम मते असून त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती असल्याची चर्चा आहे. मात्र ती मतांमध्ये उतरते का, हे पाहावे लागेल. मात्र सर्वच विधानसभेतील महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी या मतांना आपल्याकडे वळविण्याची मोहीम हाती घेतली आहे. येत्या विधानसभेत त्यांना या मतांची बेगमी आतापासून करावी लागणार आहे.
 विधानसभानिहाय दृष्टिक्षेप :
कोपरी- पाचपाखाडी : एकनाथ शिंदे (शिवसेना)
ओवळा- माजिवडा : प्रताप सरनाईक (शिवसेना)
ठाणे शहर - संजय केळकर (भाजप)
मिरा - भाईंदर : गीता जैन (अपक्ष, महायुतीला पाठींबा)
ऐरोली- गणेश नाईक (भाजप)
बेलापूर- मंदा म्हात्रे (भाजप)
प्रचारातील प्रमुख मुद्दे
राजन विचारे ठाणे रेल्वे स्थानक आणि त्यातील सोयीसुविधा, दिघा गाव रेल्वे स्थानक, ऐरोली- कटाई भुयारी मार्ग, रो-रो सेवा या कामांची जंत्री कार्यअहवालातून मांडत आहेत. यासोबतच नव्या ठाणे स्थानकाचे भिजत घोंगडे, गाळात रुतलेली जलवाहतूक व लोकल प्रवाशांचे प्रश्न आदी मुद्देही प्रचारादरम्यान चर्चेत आहेत. तर या मुद्द्यांना बगल देत आनंद दिघे यांचा खरा शिष्य कोण, गद्दार आणि खुद्दार अशा मुद्द्यांनाही दोन्ही उमेदवारांकडून हात घातला जात आहे.
लोकसभा निवडणूक निकाल
२०१४
राजन विचारे (शिवसेना) : ५ लाख ९५ हजार ३६४
संजीव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस) : ३ लाख १४ हजार ०६५
२०१९
राजन विचारे (शिवसेना) : ७ लाख ४० हजार ९६९
आनंद परांजपे (राष्ट्रवादी काँग्रेस) : ३ लाख २८ हजार ८२४
राजन विचारे
सलग दोनवेळा खासदार असल्याने मतदारसंघाचा अभ्यास, मतदारांना परिचित चेहरा असून राजकीय कार्यकाळात महापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती पदे भूषविल्याने प्रशासकीय जाण आहे. मात्र मतदारसंघात विधानसभानिहाय आमदारांचे पाठबळ नाही. तसेच दोन टर्ममध्ये नवीन ठाणे रेल्वे स्थानक, जलवाहतूक खोळंबल्याने मतदारांना स्वतःकडे टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल.
नरेश म्हस्के
माजी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती अशा पदांवर काम केल्याने प्रशासकीय अनुभव असून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, ठाणे-कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयकपदाची जबाबदारी असल्याने संघटनात्मक ताकद पाठीशी आहे. तर भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा मित्रपक्षांमधील नेत्यांशी सलोख्याचे संबंध निवडणुकीत कामी येत आहेत.