NC Times

NC Times

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाशी भेट करून द्यावी-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-'काही लोक बडबड करत सुटले तर मी असं समजतो की, त्यांना मदतीची आवश्यकता आहे. याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांची देखील मानसिक स्थिती अस्थिर दिसत आहे. एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाशी उद्धव ठाकरेंची भेट करून द्यावी आणि त्यांच्या मनावरचं दडपण दूर करावं,' असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सेनेतील नेत्यांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य करण्यासोबतच विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.
ठाकरे आणि पवारांच्या 'पक्ष फोडणारे' या वक्तव्याचा समाचार घेत फडणवीस म्हणाले की, आम्ही घर आणि पक्ष फोडणारे नाही आहोत, पण कोणी बरोबर येण्याची संधी जर मिळत असेल तर ती संधी देखील आम्ही सोडत नाही. शिवसेनेवर जी परिस्थिती आली आहे ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीवर देखील परिस्थिती फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली. शेवटी अजित दादांनाच पक्षात मान्यता होती. आमदार देखील दादांच्या पाठीशी होते. अशा परिस्थितीत दादांना डावलत पक्षात दरवेळी विलन ठरवलं गेलं. त्यामुळे अजितदादांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
ज्यांना इतिहास माहिती, त्यांनाच मोदीजींचा संदर्भ कळला असावा
पंतप्रधान मोदींनी जसं सांगितलं, शरद पवारांनी अजित पवारांकडे यावं आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदेंकडे यावं म्हणजे तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील, याचा अर्थ ऑफर होत नाही. मोदींनी हा सल्ला दिला आहे. कारण ज्या ज्यावेळी शरद पवारांचा पक्ष कमजोर झाला, त्या त्या वेळी ते काँग्रेसमध्ये गेले तिथे आपली घडी नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले. ज्यांना इतिहास माहित आहे त्यांना मोदीजींचा संदर्भ कळला असावा, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे.
निवडणूक निकालावर भाष्य करत फडणवीस म्हणाले की, निवडणूक जेवढी तुम्हाला अवघड दिसते तेवढी आम्हाला अजिबात अवघड नाही. हे खरं आहे की, ठाकरे पवार नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, ३५ जागा जिंकतील असं सांगतायत पण महायुतीतील तिन्ही पक्ष समन्वयाने काम करत आहोत, आम्हाला अपेक्षित जागा आहेत त्या मिळणारच.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होत असताना फडणवीसांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कोणाला संपवण्यासाठी राजकारण मुळीच नसतं. कोणी कोणाच्या पक्षाला संपवू शकत नाही.