नवचैतन्य टाईम्स सांगली प्रतिनिधी (संजय शिंदे)- सांगली जिल्हा बँकेमध्ये दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चौकशीनंतर या कर्मचाऱ्यांवर वर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.
जिल्हा बँकेमध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तसेच पिक विम्याच्या मदतीचा निधी वेळोवेळी जिल्हा बँकेमार्फत देण्यात येतो. हा निधी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला जातो. मात्र ज्यांची बँक खाती बंद आहेत, अथवा अन्य बँकेत खाती आहेत अशा कारणांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या कोट्यावधींचा मदत निधी बँकेत अनामत खाती ठेवण्यात येतो. जिल्हा बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड व निमणी शाखेत अपहार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणी योगेश वजरीनकर, एम.वाय. हिले आणि प्रमोद कुंभार या तिघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वजनीरकर यांने मदत निधीतील ५९ लाख रूपये परस्पर वळते करून हडप केले आहेत, तर निमणी शाखेतील कुंभार यांने २२ लाख रूपये परस्पर हडप केले आहेत. हिले हे मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी आहेत.