NC Times

NC Times

अमर प्रेम की कहाणी... पती-पत्नीचा ६० वर्षांचा सुखी संसार अन् दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार


नवचैतन्य टाईम्स अकोला (प्रतिनिधी)- अकोल्यात एका वयस्कर दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. ६० वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर ८२ वर्षीय रमेशसिंग आणि ७६ वर्षांच्या पदमाबाई या वयस्कर दाम्पत्याने जगाचा निरोप घेतला आहे. या दोघांच्या मृत्यूमध्ये ८ तासांचा फरक होता. दरम्यान दोघांचीही भेट साधारणता ६० वर्षापुर्वी रमेशसिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली. त्यावेळी ते २२ वर्षांचे, तर पदमाबाई अंदाजे १६ वर्षांच्या होत्या. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे लग्न लावले. दरम्यान लग्नानंतर पदमाबाईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात अख्खं आयुष्य घालवलं. ६० वर्षांपेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहून दोघांचं काल मध्यरात्री निधन झाले. आज २७ मे रोजी सोमवारी दुपारी राहत्या बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातले गुजराती पूरा भागातलं हे प्रकरण. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या ८ तासातच पत्नीचाही मृत्यू झाला. लग्नानंतर ६० वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग करणसिंग गौतम (वय ८२) आणि पदमाबाई रमेश गौतम (वय ७२) यांचा ६० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पदमाबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून, रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे. वरिष्ठांच्या एकमतांनी दोघांचा विवाह पार पडला होता. दोघांनाही लग्नानंतर दोन मुलं आणि दोन मुली झाल्या. मुला मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली. दोघांनी ६० वर्ष सोबत प्रवास केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला. पती रमेशसिंग यांचा दीर्घ आजाराने काल रात्री ७ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पदमाबाई यांचा देखील आज पहाटे मृत्यू झाला. पती-पत्नीच्या निधनामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. पतीचा मृत्यूचा धक्का पदमाबाईंना सहन झाला नाहीये
आज दुपारी राहत्या घरापासून वाजत गाजत पती-पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक लोकं सामील झाले होते. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. बाळापुरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कुटुंबियांनी सांगितलं की, दोघांमध्ये खूप प्रेम होतं.