NC Times

NC Times

खासदार संजयकाका पाटलांची विश्वजीत कदमांवर टीका, विशाल पाटलांचा पलटवार


नवचैतन्य टाईम्स सांगली प्रतिनिधी(संजय शिंदे)- लोकसभा निवडणुकीत काँग्रेस जिल्ह्यातून संपवावी, तसेच वसंत दादा पाटील घराणे देखील संपावे, हे षडयंत्र संजय काका पाटील यांच्या दिलदार शत्रुनेच केल्याचा पलटवार विशाल पाटील यांनी केला. त्याच बरोबर पराभवाच्या भीतीने मावळते खासदार संजयकाका पाटील हे वैफल्यग्रस्त होऊन अहंकाराची भाषा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला. भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली होती. त्याचबरोबर विश्वजीत कदम यांच्यावर टीका करताना कपटी मित्र असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेला आज विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
विशाल पाटील म्हणाले, काही लोकांनी षडयंत्र करून माझं चिन्ह खाली घातलं तरीपण माझं चिन्ह शोधून लोकांनी मतदान केले. मावळते खासदार संजयकाका टीका करताना निराश आणि वैफल्यग्रस्त झालेले दिसले. त्यांनी दिलदार मित्रांसोबत रचलेल्या षडयंत्रला यश आले नाही. जनतेतून माझी उमेदवारी आल्यानंतर त्यांचे षडयंत्र फेल झाले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले दिसले. कोणत्याही बदल्याची भावना आमच्या मनात नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्यांनी अपेक्षा का ठेवाव्यात त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करत आहे तर विश्वजीत कदम यांच्याकडून आशा का? असा प्रश्न उपस्थित करत कदमांनी जो निर्णय घेतला तो ४ तारखेला कळेल, असे आव्हान दिले.
ते पुढे म्हणाले, काका एवढे वैफल्य ग्रस्त झाले आहेत की ते काँग्रेस नेत्यांवर टीका करत आहेत. माझा दोस्तच दिलदार आहे. त्यामुळे मला दुसऱ्याकडे बघायची गरज नाही. ही दोस्ती तुटायची नाय. या दोस्तीच्या विमानातून मी दिल्लीला जाईन. काँग्रेस पक्ष संपवावा दादा घराणे संपवावे याचे षडयंत्र त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून कसे केले याची कबुली त्यांनी यावेळी दिली असल्याचा आरोप विशाल पाटलांनी केला. हे षडयंत्र रचण्यापासून काही लोक एकत्र काम करत होते. हे पुढचे राजकारण करून झाले आहेत. आमच्या नाकर्तेपणामुळे हे लोक पुढे आले ही चूक आमच्या लक्षात आल्याने आम्ही आता एकत्र आलो आहोत, असं ते म्हणाले.