नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)- एमआयडीसी फेस दोन मधील अंबर केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. डोंबिवलीत अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. घटना घडल्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशामक दलाला यश आले. पण या घटनेत जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला असून ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राज्याचे सीएम एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केले.
मुख्यमंत्री शिंदेंनी केली घटनास्थळाची पाहणी
एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे अशी प्रतिक्रिया सीएम शिंदे यांनी दिली. झालेली घटना दुर्दैवी आणि मोठ्या तीव्रतेची असल्याचे शिंदे म्हणालेत. यापूर्वी देखील असाच एक स्फोट झाला होता. त्यात देखील अनेकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे अश्या घटना घडत असतील तर उच्च स्तरीय चौकशी करु दोषी आढळतील त्यांचावर कठोर कारवाई करु असा इशारा सीएम शिंदेंनी दिला. इतकेच नव्हे तर सर्वच एमआयडीसीमध्ये अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेवू. डोंबिवली स्फोट प्रकरणात दोषी आढळतील त्यांचावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, दोषींना पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही सीएम शिंदेंनी दिली.
दुर्घटनाग्रस्तांसाठी मदत जाहीर
सीएम शिंदे यांनी स्फोटात जखमी झालेल्या कामगारांची भेट घेतली तसेच मृत्यू झाला आहे त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा केलीय. तसेच दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना सीएम शिंदेकडून देण्यात आले आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येईल अशी माहिती शिंदेंनी दिली.
राज्यातील एमआयडीसींमधील कंपन्यांची आता अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक, औद्योगिक सुरक्षा, कामगार विभाग यांना दिल्या आहेत. या वर्गवारीप्रमाणे त्या भागात त्या कंपन्या ठेवायच्या की नाही हा लोकांच्या जीविताचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. डोंबिवली एमआयडीसीतील मानवी जीविताला हानीकारक अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद केल्या जात आहेत. ज्या कंंपन्यांना अतिधोकादायक कंपनीत माहिती तंत्रज्ञान, कापड, अभियांत्रिकी विषय उत्पादन प्रक्रिया सुरू करायच्या आहेत ते असे फेरबदल करून आपले उद्योग सुरू ठेऊ शकतात. पण ज्यांना आपल्या कंपनीत बदल करायचे नाहीत ते उद्योग शहराबाहेर शासनाने उद्योगांसाठी भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
अमुदान कंपनीविषयी अनेक तक्रारी होत्या. या कंंपनीतील अंतर्गत युनिटचे प्रदूषण नियंत्रण, औद्योगिक सुरक्षा, कामगार विभागाने वेळोवेळी परीक्षण, तपासण्या केल्या होत्या का याची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल. या चौकशीतून जे या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल. यात कोणतीही तडजोड ठेवली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी स्पष्ट केले. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत.