NC Times

NC Times

पोलिस हफ्ते घेऊन गप्प पुण्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करा- मा.रोहन सुरवसे पाटील


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)- कल्याणी नगर परिसरात घडलेल्या कार अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे सुरु असणाऱ्या पब, डान्सबार, हुक्का पार्लर, रेस्टॉरंट, पार्टी क्लब्स आणि अमली पदार्थ तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हुक्का, दारू आणि अमली पदार्थांचे सेवन करुन पब आणि बारमध्ये नशेत झिंगणाऱ्या तरुणाईला आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांना पोलिस प्रशासन आळा घालणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, मुंढवा, घोरपडी, विमाननगर व कॅम्प परिसरात मुख्यत्वे पब, हुक्का पार्लर आणि डान्सबार मोठ्या प्रमाणात आहेत. अमली पदार्थ तस्करीचे अड्डे देखील याच भागात आहेत. पोलिस प्रशासन मात्र हफ्ते घेऊन रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे.
शहरात सुरु असणाऱ्या या सर्व अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुरवसे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणाईला बरबादीच्या खाईत लोटणाऱ्या पब आणि पार्टी कल्चरला बंद करण्याची वेळ आली आहे. नाईट लाईफच्या नावाखाली तरुण तरुणी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. परवानगी दिलेल्या वेळेच्या पलीकडे जाऊन पब, क्लब आणि रेस्टॉरंटचे मालक कोट्यावधी रुपयांचा नफा कमावत आहेत.
पोलिस प्रशासन हफ्ते घेऊन गप्प बसत असल्याने अवैध धंद्यांना कोणीच रोखू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात युवक काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले असून शहरातील अवैध धंद्यावर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जर पुढील आठवडाभरात कारवाई झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याचे रोहन सुरवसे-पाटील म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन दिले आहे. आतापर्यंत पुणे शहरातील ५० पब व क्लबवरती कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच, आपल्या निवेदनाची दखल घेऊन यापुढेही कारवाई सुरु ठेवणार असल्याचे आश्वासन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र, जोपर्यंत पुणे शहरातील पब संस्कृती पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस कडून पाठपुरावा सुरूच राहिल. गरज असल्यास तीव्र आंदोलने देखील केली जातील. - रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस