NC Times

NC Times

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ओएसडी कडून आपच्या महिला खासदाराला मारहाण


नवचैतन्य टाईम्स  नवी दिल्ली (प्रतिनिधी)-  आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्याशी दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या मारहाणीचे प्रकरण भाजपने चांगलेच तापवले आहे. या राजकीय वादाची राज्यसभेच्या सभापतींनीच स्वतःहून दखल (स्यू मोटो) घ्यावी अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांचे ओएसडी विभव कुमार यांनी मारहाण केल्याचे आपने मान्य केले तरी अद्याप या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल झालेली नाही व मालीवाल याही नंतर काही बोललेल्या नाहीत यावरून भाजप नेत्यांनी केजरीवाल यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली आहे.
भाजपचे खासदार, नेते, लोकसभा उमेदवार, प्रदेश भाजप नेते मालीवाल प्रकरणी केजरीवाल यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्लीतील मुख्यमंत्री निवासस्थानाजवळ बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने व घोषणाबाजी केली. राज्यसभेच्या एका महिला खासदारांना मारहाण व त्यांच्याशी गैरवर्तन झाले आहे. त्यामुळे राज्यसभा सभापतींनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी व केजरीवाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केली.
 स्वाती मालीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचे त्यांचे पूर्वीचे पती नवीन जयहिंद यांनी म्हटले आहे. आमचा घटस्फोट झाला असला तरी एक सभ्य महिला म्हणून स्वाती यांच्यामागे आपण ठाम उभे राहू असेही ते म्हणाले. इंडिया आघाडीतूनही केजरीवाल यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. आपने मारहाणीची घटना मान्य केली असेल तर केजरीवाल यांनी त्वरित कारवाई करावी असे रादज खासदार मनोज झा यांनी सांगितले.
पक्षनेत्या शाजिया इल्मी म्हणाल्या की विभव कुमार हे केजरीवाल यांचे जास्तच खास जवळचे आहेत. ते एका महिला खासदाराला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात मारहाण करतात व केजरीवाल यांना हे माहिती नाही हे अशक्य आहे. या प्रकरणी केजरीवाल यांचीही काही तरी भूमिका निश्चितपणे आहे. त्यामुळेच हे प्रकरण अधिक संशयास्पद बनत चालले आहे. कपिल मिश्रा यांनी, सत्य दडपण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर केला.
 नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बासुरी स्वराज यांनी सांगितले की केजरीवाल यांनी मौन बाळगणे संशयास्पद आहे. मालीवाल यांना मारहाण झाली तेव्हा केजरीवाल स्वतः निवासस्थानात उपस्थित होते. आपने या घटनेचा फक्त निषेध केला आहे. केजरीवाल यांनी ५० तासांनंतरही विभव कुमारांवर कारवाई का केली नाही? केजरीवाल आपल्याच पक्षाच्या महिला खासदाराच्या सुरक्षेची खात्री त्यांच्या निवासस्थानीच करू शकत नसतील, तर ते दिल्लीतील महिलांची सुरक्षा कशी सुनिश्चित करणार?
 मुख्यमंत्री केजरीवाल घटनास्थळी तेथे उपस्थित होते त्यांनी बांगड्या घातल्या आहेत का ? असा सवाल दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला. ते म्हणाले की या घटनेला ५० तास उलटले तरी केजरीवाल मौन सोडत नाहीत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून सुरू आहे.