NC Times

NC Times

भाजपचे दोन खासदार निष्क्रिय म्हणून तिसरा उपरा उमेदवार दिला-प्रणिती शिंदे


नवचैतन्य टाईम्स सोलापूर प्रतिनिधी(किरण शिंदे)-सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपला चांगलेच झोडपून काढले आहे. सोलापुरात भाजपचे दोन खासदार निष्क्रिय ठरल्याने सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार भारतीय जनता पक्षाने उपरा दिला आहे, अशी टीका त्यांनी केली. भाजपचे शरद बनसोडे निष्क्रिय होते म्हणून उमेदवार बदलला. त्यानंतर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी हे देखील निष्क्रिय निघाले म्हणून भाजपने पुन्हा उमेदवार बदलून उपरा उमेदवार दिला, ही सोलापूरकरांची शोकांतिका आहे. सत्ता असून देखील भाजपला उमेदवार बदलावा लागत आहे, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.
 ही निवडणूक नसून एक चळवळ आहे
सोलापुरातील 'हेरिटेज गार्डन' या ठिकाणी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार झाली. महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती. प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर सडकून टीका करत ही निवडणूक नसून एक चळवळ आहे. भारत देशातील संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत येणे गरजेचे असल्याचे प्रणिती शिंदे म्हणाल्या. २०१४ मध्ये सरकार १५ लाख देईल ही अपेक्षा ठेवत जनतेने भाजपवाल्यांना निवडून दिले. २०१९ मध्ये जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवत भाजपला सोलापुरात निवडून दिले. मात्र या दोन खासदारांनी सोलापूरला जवळपास २० ते २५ वर्षे मागे नेले, अशी टीका प्रणितींनी केली.
 दोन दोन वर्षे महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुका होत नाही
सोलापूरसह महाराष्ट्र राज्यातील अनेक महानगरपालिका      व जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. महानगरपालिकांत भोंगळ कारभार सुरू आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये प्रशासक आहेत. सरकार निवडणुका का घेत नाही? असा सवाल प्रणिती शिंदे यांनी केली.
 या संयुक्त पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीकुमार शिंदे, माजी गृहराज्य मंत्री सिद्धराम म्हेत्रे, माकपनेते नरसय्या आडम, काँगेस जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, राष्ट्रवादीचे शरद पवार गट अध्यक्ष सुधीर खरटमल, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, आदी मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.