नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-विमाननगर परिसरातून तरुणीचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यासाठी आरोपींनी नामांकित ॲपवरून भाडेतत्त्वावर सबस्क्राइब केलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. तरुणीचा खून केल्यावर आरोपी मुंबई, नांदेड आणि लातूरला पळाले होते. त्यामुळे त्यांच्यासह या कटात आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके या शहरांमध्ये रवाना झाली आहेत.
या प्रकरणात शिवम माधव फुळवळे (वय २१, रा. वाघोली), सुरेश शिवाजी इंदोरे (वय २३, रा. मुंबई, मूळ रा. नांदेड) आणि सागर रमेश जाधव (वय २३, रा. कसलेवाडी, लातूर) यांना अटक करण्यात आली आहे. कर्जबाजारी झाल्याने या आरोपींनी खंडणी उकळण्यासाठी भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२) हिचे अपहरण करून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
कारमध्येच खून केल्याचा संशयआरोपींनी एका ॲपवरून कार भाडेतत्वावर घेतली होती. त्यामधून आरोपींनी भाग्यश्रीचे अपहण केले. तिच्या पालकांकडे पैशाची मागणी करण्यापूर्वीच आरोपींनी चालत्या कारमध्ये तिचे नाक-तोंड दाबून खून केल्याचा पोलिसांचा कयास आहे. ही कार पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचबरोबर आरोपींनी भाग्यश्रीच्या मोबाइलवरून तिच्या पालकांना मेसेज पाठवून खंडणीची मागणी केली होती. हा मोबाइल आणि सीमकार्ड शोधण्याचे काम सुरू आहे.
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली भाड्याची कार जप्त केली आहे. या तरुणीचा मोबाइल आणि सिमकार्ड शोधण्याचे कामही सुरू आहे; तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत.