NC Times

NC Times

बसमधून उतरताच पाच जणांनी घेरलं,अन कुऱ्हाडीने वार करुन निर्घुण हत्या


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-बारामतीतील उंडवडी सुपे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. कारखेल येथे निघालेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यास बसमधून उतरताच गावातीलच पाच अल्पवयीन मुलांनी गाठले. त्यानंतर त्याच्यावर कोयते, कुऱ्हाडीने वार करून त्याचा जीव घेतला. ही भयंकर घटना आज दुपारी घडली. विनोद भोसले (१९) असे या युवकाचे नाव असून तो बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आज उंडवडी सुपे येथे बसमधून उतरून तो कारखेलकडे निघाला होता. त्याचवेळी त्याच्यावर पाळत ठेऊन असलेल्या पाच अल्पवयीन मुलांनी त्याला घेरले. त्यानंतर त्याच्यावर कोयता, सत्तूर, कुऱ्हाडीने अमानुष वार केले. यात विनोद हा गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तसेच वार वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच सुपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर काही वेळातच संशयित अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गावात झालेल्या महापुरूषाच्या जयंतीवेळी विनोद आणि या मुलांमध्ये वाद झाला होता, अशी या घटनेला पार्श्वभूमी असून या घटनेमागील मुख्य कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी तातडीने पावले उचलून हल्लेखोरांना ताब्यात घेतल्याने शांतता आहे.