NC Times

NC Times

रखरखत्या उन्हात पुन्हा ‘या’ जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढणार


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळतोय. नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केलेत. विदर्भातील अकोला, बुलढाणा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव येथे तापमान चक्क 40°c पेक्षा अधिकचे नमूद केले गेले.
एकीकडे राज्यात तापमानवाढ पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील काही भागात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि यामुळे रखरखत्या उन्हाने आणि वाढत्या उकाड्याने हैराण परेशान जनतेला काहीसा दिलासा मिळाला.
पण हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का देणारा ठरला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे ऐन अंतिम टप्प्यात नुकसान होत आहे.
अगदी हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून घेईल की काय अशी भीती आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुबार या जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस बरसला. अचानक झालेल्या पावसामुळे जिथे नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला तर दुसरीकडे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे आयएमडीने आगामी काही दिवस महाराष्ट्रात असेच वातावरण पाहायला मिळणार असा अंदाज यावेळी दिला आहे.
तसेच हवामान खात्याने येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता यावेळी वर्तवली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिट देखील होऊ शकते असेही यावेळी हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
यामुळे निश्चितच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे. येत्या 48 तासात चंद्रपूर व गडचिरोलीसहित विदर्भातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. एकंदरीत आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सत्र सुरूच राहणार आहे. यामुळे रखरखत्या उन्हात पावसाळ्याचा फिलिंग येणार आहे.
पण, राज्यातील उष्णता मात्र यामुळे कमी होणार नाही असे देखील आयएमडीने स्पष्ट केले आहे. यामुळे या पावसामुळे राज्यात गारवा तर तयार होणार नाही परंतु शेतकऱ्यांचे नुकसान मात्र हमखास होणार आहे.