NC Times

NC Times

सांगलीसाठी काँग्रेसची ठाकरेंना मोठी ऑफर


 नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)-आघाडीच्या राजकारणात वर्षानुवर्षे लढवलेली सांगली लोकसभेची जागा टिकवण्यासाठी काँग्रेसनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवा प्रस्ताव दिला आहे. सांगलीची जागा आम्हाला द्या आणि त्याबदल्यात उत्तर मुंबईची जागा तुम्हाला घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आला आहे. ठाकरेंनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे. ती मागे घेण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी ठाकरेंना केला. पण अद्याप तरी ठाकरेंनी काँग्रेसला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.                
                    सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा ठाकरेंना सोडण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे. ठाकरेंचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ असा प्रस्तावही काँग्रेसनं दिला आहे. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सांगलीतून लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटील, चंद्रहार पाटील यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजयकाका पाटील यांना होऊ शकतो.
 'सांगलीच्या बदल्यात उत्तर मुंबईची जागा घ्या असा प्रस्ताव आम्ही उद्धव ठाकरेंना दिला आहे. त्यांच्याकडून आणि चंद्रहार पाटलांकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. चंद्रहार यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतल्यास आम्ही त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊ. यासोबतच मुंबई उत्तरची जागाही ठाकरेंना सोडण्यात येईल. पाटील यांच्यासाठी हा उत्तम प्रस्ताव आहे,' असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. २०१९ मध्ये इथून काँग्रेसकडून विशाल पाटील रिंगणात होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असलेल्या विशाल यांचा भाजपच्या संजय काका पाटील यांनी दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. त्यावेळी वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला. वंचितकडून लढलेल्या गोपीचंद पडळकर यांनी तीन लाखांहून अधिक मतं घेतली. त्यामुळे विशाल पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं गेलं.
मागील निवडणुकीत वंचितनं घेतलेल्या मतांमुळे विशाल पाटील पराभूत झाले. आता वंचितची तितकीशी ताकद नाही. त्यामुळे सांगलीची जागा जिंकण्याची चांगली संधी काँग्रेसकडे आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची सांगलीत फारशी ताकद नाही. काँग्रेसचं सांगलीत चांगलं वर्चस्व आहे. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढल्यास चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर असतील. ठाकरेंनी आणि चंद्रहार पाटील यांनी जमिनीवरील वास्तव लक्षात घेऊन काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारावा. तर भाजपचा सांगलीत मोठ्या फरकानं भाजप पराभूत होईल,' असं काँग्रेस नेत्यानं सांगितलं.