NC Times

NC Times

महाराष्ट्रात ४४० मतदान केंद्र महिलांच्या हाती


नवचैतन्य टाईम्स  पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-महिलांच्या हाती राज्यातील मतदान केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला नियंत्रित मतदान केंद्र स्थापण्याच्या दिलेल्या आदेशानुसार, राज्यात ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात आले आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात २१, तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.
 मतदान प्रक्रियेत महिलांच्या रचनात्मक सहभागाचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रांत कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही; तसेच मतदान केंद्रातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
 ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापण्याच्या
निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राच्या सुरक्षिततेवर लक्ष दिले जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यानजीकच्या केंद्रांची; तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्व जण महिला असतील.                               सर्वाधिक  केंद्रे ठाणे जिल्ह्यात
 पुणे जिल्ह्यात २१ महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असेल. जळगावमध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी ३०, मुंबई उपनगरमध्ये २६, सोलापूर २२ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वांत कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.