NC Times

NC Times

लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदींचा खरा चेहरा सामान्य जनतेसमोर येणार-पृथ्वीराज चव्हाण


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-देशात विकासाचा खोटा डोलारा उभा करून मतदारांची फसवणूक करून निवडणूक जिंकू शकत नाही. येणाऱ्या ४ जूनला मोदींचा खरा चेहरा सामान्य जनतेसमोर येणार आहे, असा आरोप करून पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांना इशारा दिला. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ वाई येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
 पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, इंडिया आघाडी देशात चांगले यश संपादन करणार आहे. आजच्या तरुणांचा चेहरा म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पहिले जाते. नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपयेही आले नाहीत. मोदी व भाजपचा आत्मविश्वास ढळलेला आहे. त्यांना ही निवडणूक जिंकता येणार नाही. ते पैसे देऊन सभेसाठी लोक जमा करीत आहेत. नरेंद्र मोदींनी भरमसाठ कर्ज काढून, देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे. लडाखमधील देशाची जमीन चीनने बळकावली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांच्याबद्दलचे कायदे बदलून टाकले आहेत. या अपमानाचा बदला घेण्याची ही निवडणूक आहे. भ्रष्टाचार रोखण्याची भाषा करणाऱ्यांनी कोट्यावधींची माया जमा केल्याचा आरोप करताना, हे सरकार नैतिक व आर्थिकदृष्ट्या भ्रष्ट असल्याचे सांगून त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.
 शशिकांत शिंदे म्हणाले, माझ्यावर कितीही केसेस दाखल केल्या तरीही शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही. लोकसभा निवडणूक आल्यानेच माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधकांनी रडीचा डाव न खेळता मैदानात येऊन निवडणूक लढावी. सात तारखेपर्यंत एवढं काम करा की अंडरकरंटचा स्फोट झाला पाहिजे. जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेची निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. आजच्या सभेला उसळलेला जनसागर पाहून वाई विधानसभा मतदारसंघच विजयाचा शिल्पकार असेल, याची खात्री झाली. विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले असून, त्याविषयी निष्ठावंतांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त उद्रेक आहे. त्याचा स्फोट या निवडणुकीत होऊन महायुतीला निश्चित तडाखा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.