NC Times

NC Times

पुनम महाजन यांचे पत्ता कट तर उज्ज्वल निकम यांना उमेदवारी आशिष शेलार व सुधीर मुनगंटीवार यांचे संकट टळले

 
नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-भारतीय जनता पक्षानं उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ विधीज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापून भाजपनं निकम यांना संधी दिली आहे. यंदा भाजपनं एकूण सात खासदारांचं तिकीट कापलं आहे. विशेष म्हणजे पक्षानं मुंबईतील तिन्ही खासदारांना संधी नाकारली आहे. राज्यात गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्क्यानं विजयी झालेल्या गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांच्यानंतर आता महाजन यांचंही तिकीट कापलं गेलं आहे.
 उत्तर मध्य मुंबईत भाजपला उमेदवार सापडत नव्हता. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या नावांची चर्चा झाली. यानंतर भाजपनं इथून काँग्रेसचा उमेदवार जाहीर होण्याची वाट पाहिली. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपनं उज्ज्वल निकम यांच्या नावाची घोषणा केली. संवेदनशील खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडणारे निकम मूळचे जळगावचे आहेत. पण मुंबई ही त्यांची कर्मभूमी आहे.

 शेलारांवरील संकट थोडक्यात टळलं
उत्तर-मध्य मुंबईसाठी भाजपकडून बऱ्याच दिवसांपासून उमेदवाराचा शोध सुरू होता. आशिष शेलार यांचं नावं उमेदवार म्हणून चर्चेत होतं. पण शेलार लोकसभा लढवण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळू नये यासाठी त्यांनी बरीच धडपड केल्याचं बोललं जातं. लोकसभा लढवण्याची तयारी नसल्याचं शेलारांनी पक्षाला कळवलं होतं. निकम यांच्या उमेदवारीमुळे शेलारांवरील संकट टळलं.

पूनम महाजनांना सक्षम पर्याय द्यायचा असल्यास शेलार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा तर्क देण्यात येत होता. पण आमदारकी, राज्यात सरकार कायम राहिल्यास मंत्री होण्याची असलेली संधी यामुळे अनेकांची दिल्लीला जाण्याची इच्छा नसते. शेलार यांचीही इतक्या लवकर दिल्लीला जाण्याची इच्छा नसल्याचं बोललं जातं. निकम यांना तिकीट मिळाल्यानं शेलारांना राज्यातील राजकारणात सक्रिय राहता येईल.

मला लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी मीच प्रयत्न करतोय, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मार्चमध्ये मुनगंटीवार यांनी हे विधान केल्यानंतर त्यानंतरच्या काही दिवसांमध्येच मुनगंटीवारांना चंद्रपुरातून उमेदवारी जाहीर झाली. माजी खासदार हंसराज अहिर यांचा पर्याय असतानाही भाजपनं मुनगंटीवारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं.
नव्या संसदेच्या भव्य दरवाज्यासाठी वापरण्यात आलेलं लाकूड आम्हीच विदर्भातून पाठवलं. पण त्या दारातून वेळ जाण्याची वेळ माझ्यावर येऊ नये, अशी इच्छा मुनगंटीवारांनी बोलून दाखवली होती. राज्याच्या राजकारणात सीनिअर असल्यानं, भाजपमधील वरिष्ठ चेहरा असल्यानं भविष्यात राज्य मंत्रिमंडळात मोठ्या संधीची अपेक्षा मुनगंटीवार यांना असल्याचं बोललं जात होतं. पण पक्षानं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. शेलार मात्र लकी ठरले. त्यांचा मुनगंटीवार होता होता राहिला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.