NC Times

NC Times

उद्धव ठाकरे मर्सिडीज फिरवितात त्यांचा धंदा काय- नारायण राणे


नवचैतन्य टाईम्स सिंधुदुर्ग प्रतिनिधी(दिनेश कुडाळ)-सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या जागेसाठी अजूनही महायुतीकडून उमेदवार ठरलेला नाही. मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभा मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सभांची मुसंडी मारली आहे. विधानसभा मतदारसंघानंतर प्रत्येक विधानसभा जिल्हा परिषद निहाय प्रचार सभेचा धडाका नारायण राणे यांनी लावलेला पाहायला मिळत आहे. अजूनही महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरलेला नसला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी नारायण राणे यांनी लोकसभा मतदारसंघांमध्ये कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघांमध्ये पोषक वातावरण असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आज नारायण राणे यांनी कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये राठीवडे या गावामध्ये प्रचार सभा घेतली. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत यांचा आपल्या राणे शैलीमध्ये विरोधकांचा समाचार घेतला आहे.
 राणे म्हणाले की, 'उद्धव ठाकरे अडीज वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या दृष्टीने काय केलं? इथल्या सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभेच्या खासदाराने काय केलं ते सांगा. मी विनायक राऊत यांचं नाव देखील घेत नाही. विनायक राऊत यांना राणेवर टीका केल्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. नारायण राणे यांनी काय केलं तो आजारीच असतो. मी कधी एक दिवस तरी घरी बसलोय का? मी आजही १२ ते १४ तास काम करतो. १९८० साली माझा अपघात झाला. त्यावेळी मी २१ दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. विनायक राऊत म्हणतात की नारायण राणे आजारी असतात त्यांना डायबिटीस आहे. मुख्यमंत्री झालो त्यावेळी मला डायबिटीसचं गिफ्ट मिळालं. त्यावर माझी सर्व औषध उपचार सुरू आहेत.'
'उद्धव ठाकरे किती अनाडी आहे ते मला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना या पक्षामध्ये मी ३९ वर्ष होतो. उद्धव ठाकरे यांना काय कळतं. अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे दोन दिवस मंत्रालयामध्ये गेले. मातोश्रीच्या बाहेर पडला नाही हा माणूस. जो माणूस मंत्रालयामध्ये जाऊ शकत नाही तो सर्वसामान्यांचे प्रश्न कसे जाणून घेणार आहे. करोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी ८० कोटी गरिबांना मोफत धान्य वाटले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते कोणाला पाच किलो तरी धान्य दिलं का? उलट केंद्र सरकारकडून औषधांसाठी आलेल्या पैशातून कमिशन झालं त्याची चौकशी सुरू आहे.'
उद्धव ठाकरे यांना चांगलं बोलता येत नाही. देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. वसंतराव नाईक असे अनेक मुख्यमंत्री झाले. विरोधातील लोकांना मुख्यमंत्री गद्दार असे कधीच बोलले नाहीत. अशी भाषा कधीच बोलले नाहीत. गद्दार तुम्ही आहात. मराठी माणूस आणि हिंदुत्वाशी बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच तडजोड केली नाही. तुम्ही २०१९ ला नरेंद्र मोदी यांचं नाव वापरून मत मागितली. खासदार, आमदार निवडून आणले. सत्ता स्थापनेच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी विनंती करून देखील सोबत आले नाही. मात्र त्यावेळी शरद पवार यांनी संधी साधली. त्यांनी त्यांना चॉकलेट दिलं. तुम्हाला मुख्यमंत्री करतो. शिपाई होण्याची पात्रता नाही. मुख्यमंत्री म्हटल्यावर झटकन बाळासाहेबचं हिंदुत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करून मुख्यमंत्री झाले. आणि काय अवस्था झाली शिवसेनेची... यांच्या डोळ्या देखत ४० आमदार निघून गेले. मात्र उद्धव ठाकरे काहीही करू शकले नाही.'
 असली शिवसेना राहिली नसल्यामुळे नकली शिवसेना म्हणतात. नकली सोनं असलं तर त्याला नकलीच सोन म्हणणार. बाळासाहेबांच्या वेळी असली शिवसेना होती. बाळासाहेब यांनी हिंदुत्वाशी कधीच तडजोड केली नाही. मला सत्ता नको मी हिंदुत्व सोडणार नाही. काँग्रेससोबत या जन्मी मी जाणार नाही आणि उद्धव ठाकरे जाऊन काँग्रेसच्या सोनिया गांधींना मुजरा करतात. काय पुशारक्या मारतात'
 उद्धव ठाकरे यांचं डोकं जागेवर नाही फिरलं आहे. देशाच्या होम मिनिस्टर यांना खंडणीखोर म्हणतात. आम्ही साक्षीदार आहोत एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे ४० आमदार साक्षीदार आहेत. मी ३९ वर्ष शिवसेनेमध्ये होतो. कोण खंडणी घेत होतं आणि कुठल्या रूममध्ये खंडणी घेत होतं, ग्राउंड फ्लोअरला काय होतं. तिसऱ्या मजल्यावर खंडणी कुठे स्टोअर केली जायची हे मी सांगू शकतो. उद्धव ठाकरे मर्सिडीज फिरवतात, त्यांचा उद्योग धंदा काय? प्रिंट मीडिया माझा पण आहे त्यामध्ये प्रॉफिट काही होत नाही. करोनाच्या काळामध्ये सर्व प्रिंट मीडिया लॉसमध्ये होते मात्र सामना प्रॉफिट मध्ये होता.'
'मी एकदा शिवसेनेमध्ये असताना उद्धव ठाकरे यांनी एक गाडी घेतली होती. मी हॉलमध्ये बसलो होतो. राणे साहेब मी गाडी घेतली आहे चला दाखवतो. गाडी मी पाहिली छान आहे अभिनंदन केलं. मी त्यावेळेला विचारलं इन्कम टॅक्सला ही गाडी दाखवली का? का कशाला. गाडी इन्कम टॅक्सला दाखवावी लागते. एवढे पैसे आणले कुठून. सामनामध्ये काही मिळत नाही. बाकी काही यांचा धंदा नाही, मग काय होता धंदा तर खंडणी. आयुष्यभर तेच केलं. ते ४० गेले तेच पोच करत होते. माझ्यापेक्षा एकनाथ शिंदे अजून डिटेलमध्ये सांगतील. उद्धव ठाकरे यांनी कोणा-कोणालाही सोडलं नाही. पाच लाख रुपये पण देखील घ्यायचे. मात्र एक फोन लावण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून उद्धव ठाकरे यांनी तीन लाख रुपये घेतल्याचा' दावा नारायण राणे यांनी केला आहे.
 'भाजप म्हणजे भाडखाउ भेकड आहे. भेकड या शब्दाचं उत्तर शब्दांमध्ये देऊन उपयोग नाही, तसा आवाज काढावा लागणार आहे. कोणतीही नोटीस आली की नरेंद्र मोदी यांच्या दारी सरेंडर उद्धव ठाकरे व्हायचे. सुशांत केस आणि दिशा सॅलियन केसमध्ये किती वेळा भेटले. उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.'
शिवसेनेच्या जन्मापासून आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढण्यासाठी आणि शिवसेनेवर टीका केल्यानंतर कोणाच्या तरी कानाखाली मारली का? उद्धव ठाकरे यांनी कटकारस्थान करून अनेक शिवसैनिकांना मारलं. रमेश मोरे यांची हत्या कोणी केली अजून उघडण्यास आलं नाही. आमची सत्ता आहे आम्ही बाहेर काढू. जयेश जाधव तो बाळासाहेबांची सेवा करत होता त्याची हत्या केली आणि एक ठाण्याचा नगरसेवक आहे हे कोणी केलं हे मी पोलिसांना माहिती देणार', असे गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केले आहेत.