NC Times

NC Times

मुंबई शहरात बालमृत्यूची समस्या गंभीर


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)- राज्यामध्ये बालमृत्यूची समस्या गंभीर असताना, मुंबईत शून्य ते पाच आणि १० ते १८ वयोगटामध्ये दगावणाऱ्या मुलांची वाढती संख्याही तितकीच चिंताजनक आहे. मुंबई महामहापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये शून्य ते पाच वयोगटातील ९ हजार ९६१ मुलांचा मृत्यू झाला. तर, १० ते १८ या वयोगटातील ५ हजार ३०१ मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही वयोगटांतील बालकांच्या एकत्रित मृत्यूंची एकूण संख्या १५ हजार २६२ इतकी आहे.
 मातेचे होणारे कुपोषण, गर्भामधील व्यंग, मुदतपूर्व प्रसूती, योग्य वेळी आजाराचे निदान न होणे अशा विविध कारणांमुळे जन्माला येणाऱ्या बाळांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तर, असंसर्गजन्य आजारामुळे मृत्यू होणाऱ्या मुलांची संख्याही वाढती आहे. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ ते २०२३ या कालावधीमध्ये शून्य ते पाच वयोगटातील ९,९६१ मुलांचा, तर १० ते १८ या वयोगटातील ५,३०१ मुलांचा मृत्यू झाला.                                                       असंसर्गजन्य आजारामध्ये जीव गमावणाऱ्या मुलांची संख्या संसर्गजन्य आजारांमध्ये दगावणाऱ्या मुलांपेक्षा अधिक असल्याचे उपलब्ध आकडेवारीमधून दिसून येते. त्यात ५,५२८ मुलगे; तर ४,४३३ मुलींचा समावेश आहे. संसर्गजन्य आजारामुळे १० ते १८ या वयोगटातील १७७१, तर असंसर्गजन्य आजारामुळे २१३५ मुलांना जीव गमवावा लागला. अपघातामध्ये १०२१, तर दुर्घटनांमध्ये २५४ मुले दगावली. आजाराचे गांभीर्य लक्षात न घेतल्याने झालेल्या मृत्यूंची संख्या ७६ आहे.
 असंसर्गजन्य आजारांमुळे जे मृत्यू होतात त्यांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते यांनी व्यक्त केली. हृदयविकार, आनुवंशिक आजार, करोनानंतर मुलांमध्ये निर्माण झालेल्या व्याधींसह कॅन्सर हेदेखील आता बालकांच्या आऱोग्यापुढील आव्हान आहे. थॅलेसेमियासह इतर रक्ताच्या दुर्धर आजारांनाही मुले बळी पडतात. या मृत्यूंकडे केवळ आकडे म्हणून न पाहता हे मृत्यू टाळण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता आले असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
 तीन वर्षांत १९,७८१ बालकांचा मुदतपूर्व जन्म
उशिरा होणारे विवाह, प्रसूती या कारणांमुळे मुलांचे मुदतपूर्व जन्माला येण्याचे प्रमाण वाढते आहे. वंध्यत्वाच्या समस्येमुळे चाळीशीनंतर गर्भधारणा झाल्यास त्यामध्ये गुंतागुंत होण्यासह उच्च रक्तदाब, गर्भावस्थेमधील मधुमेह, थायरॉइड, गुणसूत्रातील विकार, वाढ खुंटणे अशा अनेक कारणांमुळे मुदतपूर्व प्रसूती होते. त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेऊन मातेच्या आरोग्यासंदर्भात अधिक काळजी घेण्याची गरज स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव-गांधी यांनी व्यक्त केली. अकाली जन्मलेल्या मुलांचा पूर्ण विकास होईपर्यंत त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागते.
 मुदतपूर्व जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या एप्रिल २०२० ते २०२३ या कालावधीत १९ हजार ७८१ होती. त्यात एप्रिल ते डिसेंबर २०२०मध्ये ही संख्या ३८२३ इतकी होती. सन २०२१मध्ये ती ४६२३, सन २०२२मध्ये ५८३३, तर सन २०२३मध्ये ही संख्या ५५०२ इतकी नोंदवण्यात आली.
अशी आहे स्थिती                                                 मृत्यूचे कारण २०१९ २०२० २०२१ २०२२


संसर्गजन्य आजार ४४२ ४४५ ४८५ ३९९


असंसर्गजन्य आजार ६२२ ४३९ ४८८ ५८६


अपघात ३०३ १९६ २४० २८२

जानेवारी २०१९ ते २०२३ (शून्य ते पाच वयोगट)
वर्ष एकूण मृत्यू मुलगे मुली
२०१९ १७७९ १००६ ७७३

२०२० १८३२ १०६६ ७६६
२०२१ १९८१ १०५५ ९२६

२०२२ २२११ १२३६ ९७५
२०२३ २१५८ ११६५ ९९३