नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. परफेक्शनिस्ट आमिर त्याच्या प्रत्येक सीनसाठी मेहनत घेताना दिसतो. याचबाबतचा त्याचा एक हैराण करणारा किस्सा आहे.
आमिर खान त्याच्या वेगळ्या भूमिकांसाठी, कंटेंटसाठी ओळखला जातो. त्याचा असाच एक सिनेमा ज्याने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती. अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर गुलाम सिनेमा हिट ठरला होता. या सिनेमात या दोन कलाकारांच्या अभिनयाने अनेकांची दाद मिळवली होती. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही अनेकांच्या लक्षात आहे.
या सिनेमातील आमिरचा एक हैराण करणारा किस्सा आहे. या सिनेमातील एका सीनसाठी आमिर खानने १२ दिवस आंघोळ केली नव्हती. इतकंच नाही, तर त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचा थर आणि इतर धूळ जमा होऊ लागली होती. या सिनेामाचा क्लायमॅक्स सीन १० ते १२ दिवसांत शूट करण्यात आला होता. इतके दिवस त्याने आंघोळ केली नव्हती.
कोणता होता तो सीन?
गुलाम सिनेमातील हा फाइट सीन होता. ज्यात आमिरने सिनेमातील व्हिलनसोबत मारामारी केली होती. त्यामुळे आमिरच्या चेहऱ्यावर रक्त आणि इतर धूळ जमा झाली होती. सिनेमाचा क्लायमॅक्स पूर्ण होईपर्यंत त्याच्या चेहऱ्याचा लूक बदलू नये यासाठी त्याने मारहाणीच्या सीननंतर आंघोळ केली नव्हती.
१९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलाम सिनेमा ७ कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. सिनेमाने १३ कोटींचा गल्ला जमवला होता. तर वर्ल्डवाइड २४ कोटींचं कलेक्शन केलं होतं. १८५ स्क्रिन्सवर सिनेमा प्रदर्शित झाला होता.