NC Times

NC Times

घटस्फोटानंतर २४ वर्षांनी शेफाली शाहचा पहिला पती म्हणाला, “आम्ही कधी एकमेकांसमोर आलो तर…”


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री शेफाली शाह आणि अभिनेता हर्ष छाया वेगळे होऊन तब्बल २४ वर्ष झाले आहेत. मात्र कुठेतरी त्यांच्या मनातली ही जखम आजही ठसठसते आहे याचा प्रत्यय हर्षने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत येतो. हर्ष आणि शेफाली यांनी १९९४ मध्ये प्रेम विवाह केला होता. त्यांची भेट एका मालिकेच्या सेटवर झाली होती. मात्र अवघ्या सहा वर्षात त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. आता सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत हर्षने त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. हा घटस्फोट आपल्यासाठी खूप अवघड होता असं तो म्हणाला आहे.
सिद्धार्थशी मुलाखतीत बोलताना हर्ष म्हणाला, 'आता माझ्यासाठी ती गोष्ट एक बंद पुस्तकाप्रमाणे आहे. इतकी जुनी गोष्ट आहे इतका वेळ गेलाय. वीस पंचवीस वर्ष झालीयेत. आता ती गोष्ट बंद झालीये. आम्ही एकमेकांशी बोलत नाही. आम्ही एकमेकांच्या संपर्कात नाही. आम्ही एकमेकांचे मित्रही नाही. मला तिच्याशी बोलण्यात काहीच अडचण नाहीये. आम्ही जर कधी भेटलो तर मला मुळीच विचित्र वाटणार नाही. अस्वस्थ वाटणार नाही. तो काळ कठीण होता. खूप कठीण होता. मी या गोष्टीकडे आता वेगळ्या पद्धतीने बघतो. मला घटस्फोटाच्या आधी आठ महिने या गोष्टीची जाणीव होत होती की आपलं लग्न चुकीच्या दिशेने जात आहे. मला त्याचा खूप त्रास झाला. मानसिकरित्या ती गोष्ट खूप थकवणारी होती.'
तर शेफालीने तिच्या एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतं. ती म्हणालेली, 'मी त्या नात्याला माझ्या आयुष्यातील बराच काळ दिला होता. मी त्या नात्यासाठी खूप मेहनत घेतली होती. मला वाटायचं की लग्न झाल्यानंतर सगळीकडे आनंदच असतो, पण तसं नाही याची जाणीव मला नंतर झाली. काही काळानंतर, तुम्हाला कळतं की तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि आजूबाजूच्या प्रत्येकासाठी काय चागलं आहे. मी प्रयत्न केले पण ते लग्न नाही टिकलं तर वेगळे झालो.' तिने हे वक्तव्य पिंकव्हीलाच्या मुलाखतीत केलं होतं.