NC Times

NC Times

लोकशाहीचा खून करणारी औरंगजेबाची प्रवृत्ती मरहट्टा मुलुख गाडल्याशिवाय राहणार नाही – उद्धव ठाकरे


नवचैतन्य  टाईम्स सांगली (प्रतिनिधी) उद्धव ठाकरे जर एवढा फालतू माणूस असेल तर माझा पक्ष का फोडलात? माझा पक्ष का चोरलात? माझ्याविरोधात अख्खी भाजप उभी केली. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी तोडली, अजून काही 'कचरा' गोळा करता आहात, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित महायुतीत एन्ट्री करत असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. उद्धव यांनी आपल्या भाषणात राज यांचं न घेता त्यांचा कचरा म्हणून उल्लेख केला.
 सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपने संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली असून, त्यांनी प्रचार मेळाव्यांना सुरुवातही केली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा घोळ संपलेला नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून चंद्रहार पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटील हेच उमेदवार असतील, असे म्हटलेले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशा स्थितीत गुरूवारी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी मिरजेत जंगी सभा घेतली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी भाजपवर तोफ डागली.
तू कसला रे मर्द? तू कसला राजकारणी? ठाकरेंकडून फडणवीसांवर जहरी वार
उद्धव ठाकरे जर फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडला याचं पहिलं मला उत्तर द्या. मी मन की बात करत नाही मी जन की बात करतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो, खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे घरफोड्या आहेत. दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि सांगायचं बघा मी दोन घरं फोडून श्रीमंत झालो. अरे दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबासारखा बसतोस, तू कसला रे मर्द? तू कसला राजकारणी? असा घणाघाती हल्ला ठाकरेंनी फडणवीसांवर चढवला.
राज यांचं नाव न घेता कचरा म्हणून उल्लेख
मी जर एवढा फालतू माणूस असेल तर माझ्याविरोधात अख्खी भाजप का उतरवली? काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना का फोडली? अजूनही तुमचं संपत नाही, 'कचरा' गोळा करताय, अशा शब्दात त्यांनी भाजपसहित राज यांच्यावर टीका केली.
 माणसं ओळखण्यात माझी चूक झाली, उद्धव ठाकरेंची कबुली
शिवसेनेनं पेरलेल्या बियांचा आता वटवृक्ष झाला आहे. भाजपच्या बियांना अंकुर देखील फुटला नाही. जो माणूस मातीत खेळतो तो मातीशी बेईमानी करत नाही. काही माणसं ओळखण्यात माझी चूक झाली, अशी कबुलीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.